नागपूर : दसऱ्याच्या निमित्ताने आज (24 ऑक्टोबर) नागपूर संघ कार्यालयात विजयदशमी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी कार्यक्रमाला उपस्थित संघाच्या कार्यकर्त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दोन भाषणं आवर्जून वाचण्याचा सल्ला दिला. तसेच आंबेडकरांची दोन्ही भाषणं पारायण करण्यासारखी असल्याचे त्यांनी नमूद केलं. (Dr Babasaheb Ambedkar’s two speeches Read again and again, Sarsangchalak Mohan Bhagwat advised)
हेही वाचा – बनावट दसरा मेळावा पुढच्या वर्षी होणार नाही; राऊतांचं शिंदे गटावर टीकास्त्र
विजयदशमी कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत म्हणाले की, सध्याच्या जगात एकमेकांविषयी जो अविश्वास आहे त्यातून आपण बाहेर पडलं पाहिजे. आपल्या देशात राजकारण स्पर्धेवर आधारित आहे. त्यामुळे आपल्यामागे जास्त अनुयायी उभे रहावेत यासाठी समाजाची विभागणी केली जात आहे. दुर्दैवाने ही परंपराच झाली आहे, असा आरोप करत राजकारणातून समाजातील अविश्वासाचं उत्तर सापडणार नाही. राजकीय वर्चस्व प्रस्थापित करून हा प्रश्न सुटेल, असं म्हणणं कुचकामी ठरेल, अशी स्पष्ट भूमिका मोहन भागवत यांनी मांडली.
Dr. Mohan ji Bhagwat at Vijayadashami #RSSnagpur2023 https://t.co/QxBVMHIqqr pic.twitter.com/7rOQz35Qm9
— RSS (@RSSorg) October 24, 2023
सर्व समाजाचा विचार करत मार्गक्रमण करावं लागेल
आपल्याकडे लोकशाही असल्यामुळे याठिकाणी सर्व लोक सारखेच आहेत, कुणी उच्च नीच नाही. या पद्धतीनुसारच आपल्याला वागावं लागेल. मात्र, आपल्याला समाजाच्या एकतेसाठी राजकारणापासून वेगळं होऊन सर्व समाजाचा विचार करत मार्गक्रमण करावं लागेल. असं करत आम्ही कुणाला शरण जातो आहे, युद्ध सुरू होतं आहे किंवा आता युद्धबंदी झाली तर, असं मानण्याचं काही कारण नाही. कारण हे स्वार्थासाठी किंवा कोणत्याही पक्षाचं आवाहन नाही. आपली प्रतिमा सुधारण्यासाठी केलेली ही कृती नाही. हे आपलेपणाचं आवाहन आहे. ज्यांना ऐकायला जाईल त्यांचं भलं होईल आणि जे यानंतरही ऐकणार नाहीत त्यांचं काय होईल, हे मला माहिती नाही, असेही भागवत म्हणाले.
हेही वाचा – Dasara Melava: शिंदे बरसणार; आझाद मैदानावरून या मुद्यांवर बोलणार?
ॐ श्री विजयदशमी उत्सव युगाब्द 5125 आश्विन शुद्ध दशमी नागपुर महानगर https://t.co/mt34RZlGfA
— RSS (@RSSorg) October 24, 2023
डॉ. आंबेडकरांची दोन भाषण वारंवार वाचा
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करताना मोहन भागवत म्हणाले की, संविधानात एकतेला मार्गदर्शक तत्व म्हणून नमूद करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान संसदेत मांडताना दोन भाषणं केली होती. ती दोन भाषणं लक्षपूर्वक वाचली की लक्षात येतं, त्यातही हाच बंधुत्वाचा संदेश आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ती दोन भाषण नक्की वाचा, वारंवार वाचा. कारण ती भाषणं पारायण करावी अशी आहेत. जसे आपण आपआपल्या श्रद्धेनुसार आपले पवित्र ग्रंथ दरवर्षी वाचतो, संघाचे कार्यकर्ते डॉक्टरांचं चरित्र दरवर्षी वाचतात, तसं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समग्र साहित्य वाचता आले नाही, तरी चालेल पण किमान ती दोन भाषणं 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला वाचत जा, अशी विनंती मोहन भागवत संघाच्या कार्यकर्त्यांना केली.