करोना व्हायरसने देशात आत्तापर्यंत तीन बळी घेतले असून मुंबईत एक बळी घेतला आहे. महाराष्ट्रात आता करोना बाधितांची संख्या ४१ वर गेली आहे. राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतही करोनाचे सात रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता राज्य सरकारने सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील अनावश्यक सेवा ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेणे आवश्यक असल्याचे सरकारने सांगितले. मात्र आज सोशल मीडियावर खास करून व्हॉट्सअॅपवर एक मेसेच व्हायरल होत आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
काय आहे तो व्हायरल मेसेज?
व्हॉट्अॅपच्या अनेक ग्रुप्समध्ये हा मेसेज फॉरवर्ड होताना दिसतोय. ज्यात लिहिले आहे की, ‘नमस्कार मी तुम्हाला विनंती करतो की आज रात्री १० नंतर उद्या सकाळी ५ वाजेपर्यंत घराबाहेर पडू नये. कोविड-१९ विषाणूंच्या खात्म्यासाठी हवेत औषधाची फवारणी केली जाणार आहे. आपल्या सर्व मित्रांना, नातेवाईकांना आणि आपल्या कुटुंबियांना ही माहिती शेअर करा. धन्यवाद!’
काय आहे सत्य?
अशा प्रकाचा मेसेज तुमच्या व्हॉट्सअॅपवरही आला असेल तर त्या मेसेजला दुर्लक्ष करा. कारण हा मेसेज १०० टक्के खोटा असून त्यात काहीही तथ्य नाही. करोना व्हायरसला जागतिक आरोग्य संघटनेने महामारी घोषित केले आहे. त्यावर अजूनही लस उपलबध नाही. हे खरे असले तरी हवेत औषध फवारणी करून करोना विषाणूंना नष्ट करण्याचे तंत्र किंवा उपाय अजूनतरी सापडलेला नाही. त्यामुळे तुमच्या व्हॉट्सअॅपवर आलेला हा मेसेज खोटा असल्याने त्यावर विश्वास ठेवू नका आणि कुणाला फॉरवर्डही करू नका. कारण असे खोटे मसेज किंवा बातम्या फॉरवर्ड तसेच व्हायरल केल्याने सायबर अॅक्टनुसार तुम्हाला अटक होऊन तुम्ही अडचणीत येऊ शकता.
हेही वाचा – व्हॉट्सॲपवर करोनाची अफवा पसरवणारे दोघे ताब्यात