घरमहाराष्ट्रअंतिम वर्षाची परीक्षा सोप्या पद्धतीने घेण्यास राज्यपाल कोश्यारी अनुकूल

अंतिम वर्षाची परीक्षा सोप्या पद्धतीने घेण्यास राज्यपाल कोश्यारी अनुकूल

Subscribe

राज्यात अंतिम वर्षाची परीक्षा सोप्या पद्धतीने घेण्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अनुकूलता दर्शवली असल्याची माहिती राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. विद्यापीठ अंतिम वर्ष परीक्षेसंदर्भात बुधवारी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राजभवनावर जाऊन राज्यपाल यांच्याशी भेट घेतली. मागील दोन ते तीन दिवसांपासून अंतिम वर्ष परीक्षेबाबत कुलगुरूंच्या बैठकासंबंधीची माहिती बैठकीत उदय सामंत यांनी राज्यपालांना दिली. परीक्षा घेण्याबाबत महाराष्ट्र शासनाने नेमकी काय तयारी केलेली आहे? सोबतच परीक्षेबाबत विद्यार्थ्यांची काय भावना आहे? त्याबाबत सुद्धा राज्यपाल यांना माहिती दिली आहे. गुरुवारी पुन्हा एकदा कुलगुरू-राज्यपाल आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांची बैठक होईल.

परीक्षांबाबत बुधवारीसुद्धा कुलगुरूंच्या मॅरेथॉन बैठका झाल्या. तीन टप्प्यात या बैठका घेतल्या जात आहेत. एक बैठक सकाळी 11 वाजता झाल्यानंतर दुपारी 1 वाजता आणि त्यानंतर दुपारी 4 वाजता कुलगुरूंची परत एकदा राज्य शासनसोबत आणखी एक बैठक होणार आहे. त्यानंतर पुन्हा एकदा कुलगुरुंची राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी दुपारी 4 वाजता बैठक होणार आहे. राज्यपाल कुलगुरू यांच्या बैठकीला उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व विभागाचे अप्पर मुख्य सचिव सुद्धा उपस्थित राहतील.

- Advertisement -

या बैठकीत झालेल्या निर्णयानंतर मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक घेण्याचे ठरवले जाऊन परीक्षांबाबत तारीख आणि परीक्षा कशा घेतल्या जाव्यात याबाबत निर्णय घेतला जाईल. शिवाय, या बैठकीनंतर परीक्षा पुढे ढकलायच्या असल्यास राज्य शासन अर्जाद्वारे युजीसीला विनंती करेल. बुधवारी झालेल्या बैठकीत कुलगुरूंचे म्हणणे तुम्ही ऐकून घ्या, त्यांना जे आवश्यक आहे ते महाराष्ट्र शासन आणि कुलपती म्हणून मी करणार असल्याचे राज्यपाल म्हणाले आहेत, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांनी माहिती दिली आहे.

याआधी झालेल्या बैठकीत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांनी कुलगुरुंचे म्हणणे समोर मांडताना परीक्षा या ऑक्टोबरमध्ये घेण्याचा विचार असून सोप्या पद्धतीने कशा घेतल्या जातील यावर विचार केल्याचे म्हटले आहे. आता पुढील दोन दिवसात या बैठकांनंतर याबाबत अंतिम निर्णय घेऊ, असे सामंत म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -