पालघर तालुक्यातील केळवे समुद्रात रविवारी पावसाच्या पिकनीकचा आनंद घेणाऱ्या चार पर्यटकांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले आहे. नालासोपारा येथील संतोष भुवन या ठिकाणी राहणारे हे तरुण केळवे समुद्रात पोहण्यासाठी म्हणून गेले होते मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने या तरुणांचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. यापैकी दोघांचे मृतदेह सापडले असून इतर दोघांचा शोध सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.
नेमके काय घडले?
नालासोपारा संतोष भुवन येथे राहणारे सात तरुण पावसाचा आनंद घेण्यासाठी रविवारी सुट्टीच्यानिमित्ताने दादरा पाडा येथे गेले होते. दुपारी अडीच्या सुमारास हे तरुण केळवे समुद्रात पाण्यात पोहण्यासाठी उतरले. मात्र खवळलेला समुद्र असताना देखील हे तरुण खोल समुद्रात गेले. अचानक या तरुणांचे पाय वाळूत रुतू लागले आणि पोहत येत नसल्याने त्यांना स्वत:ला बचावता आले नसल्याने या तरुणांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
केळवे बीचवर पिकनीकला गेलेल्या सात तरुणांपैकी दिपक चालवाडी (२०), दिपेश दिलीप पेडणेकर (१७), श्रीतेज नाईक (१५), तुषार चिपटे (१५) हे तरुण बुडाले असून गौरव सावंत (१७), संकेत जोगले (१७), देविदास जाधव (१६) हे तरुण बचावले आहेत.