गोवर – रुबेला लसीकरण मोहिमेचे सुमारे ९० टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले असून गेल्या दोन महिन्यात राज्यात २ कोटी ७० लाख बालकांचे लसीकरण करण्यात आले आहे. ग्रामीण भागात सुमारे २२ जिल्ह्यांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक बालकांना लसीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. सांगली, पुणे, उस्मानाबाद या जिल्ह्यातील ग्रामीण भागात १०० टक्क्यांहून अधिक लसीकरण झाले असून वाशीम, चंद्रपूर, अमरावती, ठाणे, परभणी, जळगाव, नंदूरबार, पालघर, गडचिरोली, नागपूर, सोलापूर, औरंगाबाद, अहमदनगर, नांदेड, हिंगोली, वर्धा, नाशिक, लातूर, भंडारा आणि धुळे या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ९० टक्क्यांहून अधिक बालकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
१०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट
गोवर-रुबेला या गंभीर आजारांचे निर्मूलन करण्यासाठी राज्यात ९ महिने ते १५ वर्षाखालील बालकांसाठी २७ नोव्हेंबर पासून लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. गेल्या दोन महिन्यात ही मोहिम सर्व शाळांमध्ये राबवण्यात आली. सध्या शाळांव्यतिरीक्त लसीकरण मोहिम सरकारी दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्रे यामार्फत सुरू आहे. शाळाबाह्य मुलांचे त्यामाध्यमातून लसीकरण केले जात आहे. १०० टक्के उद्दिष्टपूर्ती होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.
घरोघरी जाऊन लसीकरण
२७ नोव्हेंबर २०१८ पासून संपूर्ण राज्यात ‘गोवर- रुबेला’ लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली. त्यानुसार अंगणवाडी, शाळा आणि घरोघरी जाऊन सहा महिने ते १४ वर्ष वयोगटातील लहान मुलांना लसीकरण येत आहे. यापूर्वीदेखील ही मोहिम सुरू होती. परंतू यंदा विशेष लसीकरण मोहिम हाती घेण्यात आली आहे.
हेही वाचा –
गोवर-रुबेलाची लस धोकादायक नाही