महाविकास आघाडी कोसळणार अशी भाकितं करणाऱ्या भाजपला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने जोरदार टोला लगावला. अनेकजण मनात सरकार पाडण्याच्या गुढ्या उभारत आहेत, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. यावेळी त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांवर देखील भाष्य केलं.
मुंबईतल्या वडाळा येथील ट्रक टर्मिनस येथे वस्तू व सेवा कर भवनाच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन आज होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी बोलताना विरोधकांवर निशाणा साधला. “एक वातावरण तयार केलं जात आहे. सरकारमध्ये कुठे तरी रुसवे फुगवे सुरु आहेत, तसं काहीच नाही आहे पण आपण हे सरकार स्थापन केलं त्याचं नाव महाविकास आघाडी नाव ठेवलं आहे. महाविकास हा नुसता नावामध्ये नाही आहे, तो प्रत्यक्षात आपण जमिनीवर अंमलात आणतोय,” असं मुख्यमंत्री म्हणाले.
अनेकदा घोषणा होता, नारळवाल्याचा खप जोरात होतो, अनेकवेळा अनेकजण नारळ फोडतात, आणि त्या कोनशिला तशाच असतात. आजचं भूमिपूजन केवळ नारळ फोडण्यासाठी नाही आहे. काम आजपासून सुरु करतोय. आपण उदाहारण ठेवतोय सर्वांसमोर…त्यानंतर आपल्यामध्ये कटूता निर्माण व्हावी, यासाठी काहीजण मनातल्या मनात गुढ्या उभारत आहेत. कारण दुसरा उद्योग नाही आहे. त्यामुळे सरकार पडण्याच्या आणि पाडण्याच्या गुढ्या मनातल्या मनात उभारत असतात. त्यांना आपण आपल्या कृतीतून चोख उत्तर दिलं आहे, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा आमच्या कोणाच्या मनामध्ये भेदभाव नाही, असं स्पष्ट केलं.
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, अशा कार्यक्रमांमध्ये राजकीय बोलू नये पण काही वेळा बोलल्या शिवाय गत्यंतर नाही. सध्या काही वातावरण निर्माण केलं जातंय, महाराष्ट्राची बदनामी केली जात आहे. हे कारस्थान, षडयंत्र उघड उघड दिसतंय. त्या महाराष्ट्र द्वेष्ट्यांना सांगायचं आहे, देशाच्या अर्थव्यवस्थेला महाराष्ट्र जो आधार देत आहे, महाराष्ट्र जो योगदान देतोय, ते योगदान जर बाजूला काढला तर देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का लागू शकतो. महाराष्ट्र हा प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर राहिला आहे. महाराष्ट्राला बदनाम करु नका, अस उद्धव ठाकरे म्हणाले.