मुंबईतील मानखुर्द येथे काल, रविवारी उशिरा रात्री झालेल्या गाड्यांच्या तोडफोडीबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याप्रकरणी दोषींवर कडक कारवाई केली जाईल असे सांगितले. ते म्हणाले की, ‘सर्व जाती, धर्माच्या लोकांनी एकत्रपणे गुण्यागोविंदाने राहायला पाहिजे. त्या दृष्टीकोनातून सगळ्यांनी सहाकार्य करावे. पोलीस आपल्यापरीने कायदा-सुव्यवस्था राखण्याचे काम पूर्णपणे करत आहेत. कुठेही गरजेपेक्षा जास्त अॅक्टिव्हीटी झाली आणि त्याच्यात जे लोकं समोर येतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.’
पुढे वळसे पाटील म्हणाले की, ‘गेल्या काही दिवसांपासून राज्यांमध्ये आणि देशामध्ये काही राजकीय नेत्यांकडून समाजा-समाजामध्ये संघर्ष निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून, द्वेष निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून राजकीय वक्तव्य केली जातायत. काही भूमिका देखील घेतल्या जातायत. पोलिसांचे संपूर्ण लक्ष यावर आहे. ज्यावेळी या घटनेतून कोणीही समोर येईल, त्याला माफ केले जाणार नाही. त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.
नेमकी घटना काय?
मानखुर्द येथील म्हाडा कॉलनी परिसरात रविवारी रात्री काही लोकांनी एकत्र येऊन तोडफोड करण्यास सुरुवात केली. 15 ते 20 जणांच्या जमावाने एकत्र येऊन रात्री 10 वाजता गाड्यांची तोडफोड केली. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. पण सध्या संपूर्ण परिसरात तणावपूर्ण शांतता पसरली आहे.
हेही वाचा – sadhvi saraswati : दुसरा द कश्मीर फाईल्स रोखण्यासाठी तलवार बाळगा, साध्वी सरस्वतींचे तरूणाईला आवाहन