Ajit Pawar | मुंबई – छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबाबत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षकच होते. मी कधीही महापुरुष आणि स्त्रियांबाबत चुकीचं बोललेलो नाही, असं अजित पवार म्हणाले. आपली भूमिका मांडताना त्यांनी संभाजी महाराज यांच्या स्मारकाचाही मुद्दा उपस्थित केला आहे. या स्मारकासाठी निधी जाहीर केल्यानंतरही सरकारने अद्यापही त्यावर कार्यवाही का केली नाही असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी आज अजित पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर करण्यात आलेल्या स्मारकाची माहिती दिली. ‘गेल्यावर्षीच्या अर्थसंकल्पाच्या पहिल्याच पानावर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाला मंजुरी देण्यात आली होती. शिरुर तालुक्यातील वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक बांधण्यासाठी २५० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे,’ अशी माहिती अजित पवारांनी दिली. मात्र, याबाबत अद्याप काम सुरू झालेलं नाही.
हेही वाचा – मी कुठल्याही महापुरुषांबद्दल चुकीचं बोललो नाही, अजित पवार त्या वक्तव्यावर ठाम
अधिवेशनात मी शौर्य दिनाचीही माहिती दिली होती. मात्र, त्यावरही काही झालं नाही. या योजनेला सरकारने अघोषित स्थगिती दिली आहे की काय माहिती नाही. संभाजी महाराज यांचे ज्याठिकाणी स्मारक बांधण्यात येणार आहे त्या आजूबाजूला देहू, आळंदी आहे. म्हणजे, तिथे वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात येतो. त्याजवळ विजयस्तंभही आहे. अशाप्रकारचे स्मारक किंवा मंदिरं बांधली जातात तेव्हा त्याला भेट देण्याकरता अनेकजण येत असतात. त्यामुळे हे स्मारक लवकरात लवकर होणं गरजेचं आहे, असं अजित पवार म्हणाले. या योजनेसाठी राजकीय इच्छाशक्ती कमी पडत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. स्मारकासाठी तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. बांधकाम विभागाशी बोललो आहे. पण या सरकारची स्मारकासाठी राजकीय इच्छाशक्ती कमी पडत आहे, असं अजित पवार म्हणाले.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
महाविकास आघाडी सरकारच्या काळात आम्ही छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी निधी मंजूर केला. अर्थसंकल्पाच्या पहिल्याच पानावर या योजनेविषयी मंजुरी आहे. तसंच, येत्या वर्षांपासून छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी शौर्य पुरस्कार सुरू करण्याचेही ठरवण्यात आले होते. ११ मार्च रोजी ही मान्यता मिळाली. त्यानंतर १५ जूनला सगळ्यांची बैठक लावली. या बैठकीत जीआर काढण्यात आला. यावेळी २७९.२४ लाखाच्या कामाला मान्यता दिली गेली. त्याआधी ९ जून २०२२ रोजीही उच्चाधिकारी समितीत स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांच्या स्मारकाला मान्यता देण्यात आली होती. दोन्ही बैठकींनंतर ताबडतोब कामाला सुरुवात झाली. ३० जूनला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ३० जून रोजीच स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांच्या स्मारकाच्या कामासाठी जीआर निघाला. म्हणजेच, स्मारकाबाबतच्या सर्व जीआरमध्ये स्वराज्यरक्षक म्हणूनच उल्लेख आहे, असं अजित पवार म्हणाले.