मोदी सरकारने फक्त जाहीरातबाजीवर कोट्यावधी रुपये खर्च केले, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. मोदी सरकारने देशावर फक्त कर्जाचा डोंगर उभा केला, असादेखील आरोप त्यांनी केला. मोदीसाहेबांच्या कृपेने देशाची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. ‘देशावर ८४ लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर मोदी सरकारने उभा केला आहे. देशातील सव्वाशे कोटी जनतेच्या डोक्यावर ६५ हजाराचे कर्ज करुन ठेवण्यात आले आहे’, असे जयंत पाटील म्हणाले आहेत.
नेमकं काय म्हणाले जयंत पाटील?
जयंत पाटील म्हणाले की, ‘३० लाख कोटी रुपये उभे केले ते कशावर खर्च केले. देशावर कर्जाचा डोंगर उभा केलात तर त्यातून संरक्षणावर किती, देशातील रस्त्यावर किती खर्च केले याचा हिशोब मोदी सरकार देणार नाही. आज पानभरुन वृत्तपत्रात जाहिराती यायला लागल्या आहेत. एका वृत्तपत्रात दोन-दोन, तीन-तीन जाहिराती दिल्या गेल्या आहेत. यावर लाखो कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत. या देशात भाजप कामापेक्षा जाहिरातीवर जास्त खर्च करत आहे. प्रवासावर खर्च वाढला आहे. परदेशी दौर्यांवर खर्च जास्त झाला आहे. कामांपेक्षा जास्त गाजावाजा करण्यात आला आहे. त्यामुळे साडेचार वर्षांत वाढलेल्या कर्जाचा हिशोब मोदींना द्यावाच लागेल.’