फास्ट टॅगचा उडालेला बोजवारा आणि टोल वसुली ठेकेदाराचा भोंगळ कारभार यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खालापूर टोल नाक्यावर वाहतूक कोंडी नित्याची झाली असून, प्रवासी संताप व्यक्त करीत आहेत.
रविवारी दुपारी 4 वाजल्यापासून टोल नाक्यावर मुंबई आणि पुणे मार्गिकेवर दीड ते दोन किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या. फास्ट टॅग यंत्रणा योग्य प्रकारे कार्यान्वित नसून प्रत्येक टॅग टोलनाक्यावरील कर्मचारी स्कॅन यंत्र हातात घेऊन तपासताना दिसत आहेत. ही पद्धत वेळखाऊ असल्याने वाहनचालकांचा नाहक खोळंबा होत आहे.
टोल नाक्यावर टोल वसुली केबिनपासून दोनशे मीटरवर पिवळा पट्टा मारण्यात आला असून, त्या बाहेर वाहन गेल्यास टोल वसुली न करताच वाहन सोडण्याचा नियम आहे. परंतु तसे न करता टोल वसुली करण्यात येत असल्याने प्रवासी संताप व्यक्त करीत आहेत. रुग्णवाहिकांनाही येथील वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे.
दर शनिवारी, रविवारी अशा प्रकारे वाहतूक कोंडी सहन करावी लागते. टोल देऊन झटपट प्रवास होईल ही अपेक्षा फोल ठरत आहे. पनवेलहून खालापूर टोल नाक्यावर यायला दहा मिनिटे लागतात. परंतु वाहतूक कोंडीने अधिकची पंधरा मिनिटे वाढत आहेत. टोल नाक्यावरचा कारभार सुधारला नाही तर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.
-नीलेश पाटील, भाजप युवा नेता, खालापूर