सिंधुदुर्ग – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले दोन वर्षे गणेशोत्सव अत्यंत मर्यादीत स्वरुपात साजरा करण्यात आला. मात्र, यंदा गणेशोत्सवावरील निर्बंध हटवण्यात आल्याने गणेशभक्तांनी जल्लोष केला आहे. दरम्यान, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही यंदा वाढली आहे. दोन वर्षांनंतर चाकरमानी कोकणात गेले असून एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात तब्बल अडीच लाख चाकरमानी दाखल झाले आहेत.
कोकणात गणेशोत्सवाचा तुफान जल्लोष असतो. मुंबई-पुण्यातील अनेक कोकणी मंडळी गणेशोत्सवात आवर्जून गावी जातात. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्याही तीन महिने आधीपासून फुल्ल होतात. दरम्यान, कोकणी मंडळींसाठी सरकारकडून अधिकच्या रेल्वे गाड्या सोडण्यात येतात. या जादा रेल्वे गाड्यांच्याही तिकीटे फुल्ल होतात. त्यामुळे काहीजण लक्झरी, एसटीचा पर्याय अवलंबतात. यंदा दोन वर्षांनी गणेशोत्सव साजरा होणार असल्याने रेल्वे गाड्या तुडुंब भरल्या तर आहेतच, शिवाय रस्ते मार्गावरून धावणाऱ्या गाड्याही फुल्ल झाल्या आहेत. त्यामुळे अगदी उद्यावर येऊन ठेपलेल्या बाप्पाच्या तयारीसाठी कोकणात वेग आला आहे.
गणेशोत्सवासाठी २७२ विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या. तर, नियमित ३२ गाड्या आहेत. एसटीच्या ३ हजार ५०० बसेस सोडण्यात आल्या असून १ हजार ९५१ गाड्यांना ग्रुप बुकिंग मिळाली असल्याची माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.
दरम्यान, सिंधुदुर्गात आतापर्यंत अडीच लाख चाकरमानी दाखल झाले आहेत. तर, ६८ हजार ९५२ घरांमध्ये तर ३२ सार्वजनिक बाप्पांचे उद्या आगमन होणार आहे.