सोलापूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व समान्यांकडून जीएसटीच्या माध्यमातून कर गोळा केला आणि तो त्यांच्या 20-22 उद्योगपती मित्रांना दिला आहे. त्यांचे कोट्यवधींचे कर्ज माफ केले. काँग्रेसचे सरकार आल्यानंतर कोट्यवधी युवकांना लखपती करण्याचा निर्धार काँग्रेसने केला आहे. महिला दिवसभर घरात काम करतात मात्र त्याचे कोणतेही मानधन त्यांना मिळत नाही. गृहणींसाठी काँग्रेस गृहलक्ष्मी योजना आणणार आहे. गरीब कुटुंबातील महिलांना दरवर्षी एक लाख रुपये देण्याचे आश्वासन काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी दिले आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ राहुल गांधींची सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेमध्ये ते बोलत आहेत. यावेळी काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे, माढ्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते.
राहुल गांधी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :
– शेतकरी, बेरोजगार युवकांना न्याय मिळाला पाहिजे. इंग्रजांच्या काळातही शेतकऱ्यांवर एवढा अन्याय झालेला नाही जेवढा मोदींच्या काळात झाला. मोदी जर अंबानी, अदानींना मदत करु शकत असतील तर आम्ही शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या बाजूने आहोत.
– मोदी आता घाबरलेले आहेत. त्यांना लक्षात आले आहे की निवडणूक हातातून जात आहे. त्यामुळे ते एकानंतर एक खोटं बोलत आहे.
– मोदींना कळाले आहे की भारतातील जनतेला आता सर्वकाही कळाले आहे. त्यांना समजले आहे की संविधानाला त्यांच्याकाळात धोका आहे.
– नरेंद्र मोदी हे गरीबांच्या बाजूने नाही तर त्यांच्या अब्जाधीश मित्रांसाठीच काम करत आहेत.
हेही वाचा : Lok Sabha : मोदींनी अब्जाधीश बनवले, आम्ही कोट्यवधी लखपती घडवणार; राहुल गांधींकडून घोषणांचा पाऊस
– काँग्रेस कोट्यवधी युवकांना, पदवीधर तरुणांना लखपती करणार
– मोदींनी दहा वर्षांत शेतकरी कर्जमाफी केली नाही.
– आमचे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या झटक्यात शेतकरी कर्जमाफी दिली जाईल
– आमचे सरकार शेतकरी कर्जमाफीसाठी एक आयोग तयार करेल जे वारंवार शेतकरी कर्जमाफीसाठी काम करेल
– अंगणावाडी सेविकांना पगारवाढ देणार
– प्रत्येक गरीब महिलेला वर्षाला एक लाख रुपये
– सरकारी नोकर भरतीमध्ये 50% जागा महिलांसाठी राखीव
– मजुरांना 400 रुपये दैनिक भत्ता
– 15 टक्के दलित, 8 टक्के आदिवासी, 15 टक्के अल्पसंख्याक, 5 टक्के गरीब जनरल कास्ट आणि 50 टक्के मागाससमाज आहे.
– मीडिया कंपनीच्या मालकांची यादी तयार केली
– मीडियामधील अँकरची यादी केली 300 हून अधिक अँकर आहेत. त्यामध्ये एकही दलित नाही, एकही ओबीसी, एकही आदिवासी नाही.
– देशातील 90 टक्के लोकसंख्येतील एकही तिथे नाही. मग ते तुमचे, सर्वसामान्यांचे प्रश्न कसे उपस्थित करतील?
– शेतकरी, गरीब, युवकांसाठी काँग्रेसच्या विविध योजना
– उद्योगपती, सीईओ यांच्यातही 90 टक्के जनतेपैकी कोणी नाही.
– उद्योगपतींचे लाखो, कोटी रुपये कर्ज माफ होते. त्यापैकी एकही तुमच्यापैकी एक नाही.
– सर्वाधिक जीएसटी गरीब, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, गरीब जनरल कास्ट देत आहे. मग कर्ज माफी फक्त 22-25 उद्योगपतींचेच का?
– दिल्लीत 90 आयएएस अधिकारी आहेत. जे देशाचे सचिवालय चालवतात.
– त्यामध्ये 1 आदिवासी, 3 दलित, 3 ओबीसी आहेत.
– देशाचे सरकार 100 रुपये खर्च करत असेल तर 6 रु. 10 पैशांचा निर्णय हे सहा-सात अधिकारी घेऊ शकतात. तिथेही तुमची भागिदारी नाही.
– नरेंद्र मोदी 22-25 उद्योगपतींना घेऊन देशाचे संविधान बदलण्याचा प्रयत्न करत आहे.
– राम मंदिराचे उद्घाटन असेल, नवीन संसदेचे उद्घाटन यामध्ये देशाची प्रथम नागरिक राष्ट्रपतींचा चेहरा तुम्ही पाहिला का? राष्ट्रपती आदिवासी असल्यामुळे त्यांना तिथे पाय ठेवू दिला नाही.
– त्यामुळे देशाचे सर्वेक्षण करायचे आहे. देशात जातीय जनगणना करायचा आहे. त्यासोबत आर्थिक सर्वेक्षण केले जाईल आणि दूध का दूध पाणी का पाणी केले जाईल.
– काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्याबरोबर आम्ही हे काम करणार आहोत.
– भाजप जेवढा पैसा उद्योगपतींना देणार तेवढाच पैसा आम्ही दलित, आदिवसी, आणि मागास समाजाला देणार
राहुल गायकवाड यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
सोलापूरमधील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी दोन दिवसांपूर्वीच वंचित बहुजन आघाडीला रामराम ठोकत निवडणुकीतून माघार घेतली होती. आज त्यांनी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
Edited by – Unmesh Khandale