मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून भाजपामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), ठाकरे गट यांच्यामधील प्रमुख नेते हे भाजपामध्ये प्रवेश करताना पाहायला मिळत आहेत. येत्या काही महिन्यात काँग्रेसमधील आणखी काही महत्त्वाचे नेते भाजपाचा झेंडा हाती घेणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून देण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. परंतु, या पक्ष प्रवेशांमुळे आता भाजपामधील ज्येष्ठ आणि एकनिष्ठ नेत्यांवर अन्याय तर होत नाहीये ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे. यातच आता भाजपाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष माधव भांडारी यांच्या मुलाने केलेली एक पोस्ट सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरली आहे. या पोस्टच्या माध्यमातून माधव भांडारी यांनीच आपल्या मनातील खदखद तर व्यक्त केली नसेल ना, असेही बोलण्यात येत आहे. (Madhav Bhandari son Chinmay Bhandari post about BJP caught everyone’s attention)
भाजपाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष माधव भांडारी हे गेल्या काही महिन्यांपासून पक्षापासून दूर असल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या अशोक चव्हाणांना खासदारकी जाहीर झाल्यानंतर अचानकपणे माधव भांडारी यांच्याविषयी चर्चा रंगली. कारण माधव भांडारी यांनी काँग्रेसविरोधातील आपली भूमिका कायमच आक्रमकपणे मांडली आहे. परंतु, तरी देखील पक्षाकडून त्यांना साधी विधान परिषदेचीही उमेदवारी आजपर्यंत दिली गेली नाही. याच मुद्द्यावरून आता चिन्मय भांडारी यांनी पोस्ट करत त्यांच्या वडिलांना म्हणजेच माधव भांडारी यांनी केलेल्या कामाचे त्यांना कमी फिळाल्याचे बोलून दाखवली आहे.
X या सोशल मीडिया साइटवर चिन्मय भांडारी यांनी इंग्रजीमध्ये भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमधून त्यांनी माधव भांडारी यांनी जनसंघात केलेल्या प्रवेशापासून ते आक्रमक प्रवक्ते म्हणून अशी त्यांची बनलेली ओळख याबाबत लिहिले आहे. तर या पोस्टमधून चिन्मय यांनी 12 वेळा माधव भांडारी यांचे नाव विधानसभा किंवा विधान परिषद निवडणुकीच्या चर्चेत आल्याचेही सांगितले. पण एकदाही त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी याबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. परंतु, “मला आजघडीला नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा कोणताही अधिकार नाही. मला ते करायचेही नाही. कारण माझ्या वडिलांप्रमाणेच माझाही त्यांच्यावर विश्वास आहे.” असेही चिन्मय भांडारी यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
काय आहे चिन्मय भांडारींची पोस्ट?
ही खूप वैयक्तिक पोस्ट आहे आणि हे माझे वैयक्तिक मत आहे, असे पोस्टच्या सुरुवातील म्हणत चिन्मय भांडारी यांनी लिहिले आहे की, माझ्या वडिलांनी 1975 साली जनसंघ किंवा जनता पक्षात प्रवेश केला. आता त्या गोष्टीला 50 वर्षे उलटली आहेत. त्यानंतर फक्त पाच वर्षात, म्हणजे 1980 साली जनसंघाचे रुपांतर भारतीय जनता पक्षात झाले. माझ्या वडिलांना अनेकजण भाजपाचे एक आक्रमक प्रवक्ते म्हणून ओळखतात. पण ते याहून खूप काही आहेत आणि त्यांनी याहून खूप काही केले आहे.
पक्षासाठी, जनतेसाठी काम करत असताना ते प्रसिद्धीच्या वलयापासून लांब राहिले. त्यांनी कधीच त्यांच्या पदाचा वैयक्तिक लाभासाठी गैरवापर केला नाही. पण दुर्दैवाने त्यांना कायमच केलेल्या कामाचे अत्यंत कमी फळ मिळाले. मी माझ्या आयुष्यात 12 वेळा त्यांचे नाव विधानसभा किंवा विधानपरिषद निवडणुकीच्या चर्चेत आल्याचे पाहिले आहे. आणि एकदाही त्यांना उमेदवारी मिळाली नाही. मला आजघडीला नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा कोणताही अधिकार नाही. मला ते करायचेही नाही. कारण माझ्या वडिलांप्रमाणेच माझाही त्यांच्यावर विश्वास आहे. पण मला या सगळ्यातून वारंवार आशाही वाटते आणि त्याच्या वेदनाही होतात.
मी सार्वजनिक आयुष्यापासून लांब राहतो. त्यामुळे असे काही मी याआधी कधीच बोललेलो नाही. त्याचबरोबर मला याचीही जाणीव आहे की मी त्यांनी उभ्या केलेल्या कर्तृत्वामध्ये फारशी भर टाकू शकत नसताना माझ्या एका कृतीमुळे ते उद्ध्वस्त होऊ शकेल. पण मी आयुष्यभर या सगळ्यावर मौन बाळगून होतो. पण आज बोलण्याची वेळ आली आहे असे मला वाटले, असे चिन्मय भांडारी यांनी आपल्या पोस्टमध्ये सविस्तरपणे लिहिले आहे.
This is a deeply personal post, and it is my personal thought process.
Not many know that I am @Madhavbhandari_ (Madhav Bhandari, Vice President of BJP Maharashtra) son.
Today, I want to write about my father.
My father joined the Jansangh/Janata Party in 1975, a few years… pic.twitter.com/SHMzOtwFHn
— Chinmay Bhandari (@iTsChinmay) February 15, 2024
त्यामुळे आता चिन्मय भांडारी यांनी आपल्या वडिलांसाठी म्हणजेच माधव भांडारी यांच्यासाठी लिहिलेल्या या पोस्टमधून पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या या नाराजीबाबत आता भाजपाकडून काही भूमिका स्पष्ट करण्यात येते की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण भाजपामध्ये सुरू झालेल्या इनकमिंगमुळे पक्षातील एकनिष्ठ नेते, पदाधिकारी नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. पण आता चिन्मय यांच्या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात भाजपा नेत्यांच्या नाराजींच्या चर्चांना उधाण आले आहे.