घरमहाराष्ट्रराज्यातील महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद

राज्यातील महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद

Subscribe

विद्यापीठ आणि महाविद्यालयीन वर्ग, परीक्षा ऑनलाईन होणार

कोरोना आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, स्वयंअर्थसहित विद्यापीठे, अभिमत विद्यापीठ, तंत्रनिकेतन तसेच विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील वर्ग आणि परीक्षा 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत फक्त ऑनलाईन पद्धतीने सुरू राहतील, अशी घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी बुधवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केली.

उदय सामंत यांनी कोरोना आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ, महाविद्यालयीन परीक्षा, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे लसीकरणाबाबत दूरदृश्य प्रणालीद्वारे (ऑनलाईन) राज्यातील विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, अकृषी विद्यापीठाचे कुलगुरू यांच्यासमवेत कोरोना परिस्थितीचा मंगळवारी आढावा बैठक घेतली.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर बोलताना सामंत म्हणाले, विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना काही अडचणी आल्या. यामध्ये विजेची अनुपलब्धता किंवा नेटवर्क कनेक्टिविटी नसल्यामुळे अथवा स्वत: विद्यार्थी किंवा कुटुंबीय कोविडबाधित असल्यास संबंधित विद्यार्थी परीक्षा देऊ शकला नाही तर अशा विद्यार्थ्यांची ऑनलाइन पद्धतीने पुनर्परीक्षा देण्याची संधी देण्यात यावी. तसेच गोंडवाना विद्यापीठ, जळगाव विद्यापीठ आणि नांदेड विद्यापीठाशी संलग्नित काही भागात नेटवर्किंग सेवा विस्कळीत असल्यास किंवा उपलब्ध नसल्यास संबंधित जिल्हाधिकार्‍यांची परवानगी घेऊन ऑफलाईन स्वरुपात या भागातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचे नियोजन करावे.

परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना येणार्‍या संभाव्य अडचणी आणि शंकाचे निरसन करण्यासाठी विद्यापीठ , महाविद्यालयाने हेल्पलाईन व्यवस्था सुरू करावी. परीक्षेची कार्यपद्धती, परीक्षांचा अभ्यासक्रम, नमुना प्रश्नसंच इत्यादी विद्यापीठांनी त्यांच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून द्यावी, असे सामंत यांनी सांगितले.

- Advertisement -

सर्व विद्यापीठे तसेच महाविद्यालयाशी संबंधित वसतिगृहात राहत असलेल्या विद्यार्थ्यांना पूर्वसूचना आणि कालावधी देऊन ही वसतिगृह बंद करण्यात यावेत. यामध्ये परदेशी विद्यार्थी, संशोधन करीत असलेली पीएचडीचे विद्यार्थी यांना वसतीगृहात राहण्याची परवानगी देण्यात यावी. या विद्यार्थ्यांना संसर्ग होणार नाही याबाबत विद्यापीठ आणि महाविद्यालय प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी. स्थानिक प्राधिकरण कोविड केअर सेंटर म्हणून वसतिगृह आवश्यकता असल्यास ती उपलब्ध करून देण्यात यावी, अशा सूचनाही उदय सामंत यांनी यावेळी केल्या.

विद्यापीठे तसेच महाविद्यालयांनी अद्याप लसीकरण न झालेल्या विद्यार्थी यादी स्थानिक प्राधिकरणांना देऊन लसीकरणासाठी विशेष मोहीम राबवून तसेच विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करून तातडीने लसीकरण पूर्ण करून घ्यावे. तंत्रनिकेतनमधील विद्यार्थी 15 ते 18 या वयोगटातील असल्याने आणि या वयोगटातील व्यक्तीचे लसीकरण सुरू झाले असल्याने संचालक, तंत्रशिक्षण यांनी लसीकरण करावयाच्या विद्यार्थ्यांची यादी स्थानिक प्राधिकरणाला उपलब्ध करून द्यावी. विशेष मोहिमेद्वारे लसीकरण पूर्ण करून घ्यावेत, असे सामंत यांनी सांगितले.

तसेच संचालक कला यांनी ऑनलाईन चित्रकला परीक्षेसंदर्भात नियोजन करून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा घेण्यात याव्यात. तसेच विद्यापीठ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची चक्राकार पद्धतीने 50 टक्के उपस्थितीचे नियोजन करण्यात यावे. विद्यार्थ्यांनी कोरोनाच्या या संकटावर मात करण्यासाठी मास्क वापरणे, हात वारंवार धुणे, सामाजिक अंतर राखणे या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही सामंत यांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -