राज्यात कोरोना रुग्णांची संख्येत दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई, पुणे, नागपूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. जागतिक कोरोना रुग्णसंख्येत महाराष्ट्र ११ व्या स्थानी पोहचला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या आकड्यात भर पडत असली तरी कोरोनाबाधितांच्या मृत्यूमध्ये घट झाल्याची चांगली बाब आहे. राज्यात २४,६४५ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २५,०४,३२७ झाली आहे. राज्यात २,१५,२४१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज ५८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ५३,४५७ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१३ टक्के एवढा आहे. राज्यात आज ५८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई १०, नाशिक ६, पिंपरी-चिंचवड ४, औरंगाबाद ३, नांदेड ५, अमरावती ४, नागपूर १२ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या एकूण ५८ मृत्यूंपैकी ४४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ८ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ८ मृत्यू पुणे २, औरंगाबाद २, गोंदिया २, ठाणे १ आणि नांदेड १ असे आहेत.
आज १९,४६३ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण २२,३४,३३० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.२२ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,८४,६२,०३० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २५,०४,३२७ (१३.५६ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १०,६३,०७७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ११,०९२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.