राज्यातील सकल मराठा समाजाने आरक्षणाच्या मुद्यावर महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. आजच्या बंदला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांनी विधानभवन प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर “आत्मक्लेश”आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. आत्मक्लेश आंदोलनाच्या माध्यमातून आमदार आबिटकर हे मराठा समाजाच्या आंदोलनास पाठिंबा देणार आहेत. या आत्मक्लेश आंदोलनास परवानगी मिळावी यासाठी मागणीचे पत्र आबिटकर यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना पाठवले आहे. तसेच विधिमंडळाच्या सचिवालयाची देखील आबिटकर यांनी पत्र देऊन परवानगी मागितली आहे.
वाचा – मराठा आरक्षण: आज महाराष्ट्र बंद!!
अकरा वाजता आत्मक्लेश आंदोलन
आज सकाळी अकरा वाजता आमदार प्रकाश आबिटकर आत्मक्लेश आंदोलनाला बसणार आहेत. विधानसभा अध्यक्षांना पाठवलेल्या पत्रात आबिटकर यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे याकडे लक्ष वेधले आहे. मराठा समाजाने वतीने मागील वर्षभरापासून शांततेमध्ये ५८ मोर्चे काढले. त्यानंतरही सरकारने अपेक्षित दखल घेतली नाही. त्यामुळे मराठा समाजने पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले. या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसेचे गालबोट देखील लागले. तर आरक्षणाच्या मुद्यावरून आत्तापर्यंत मराठा समाजातील सहा ते सात जणांनी आपले जीवन संपवले आहे.
आज महाराष्ट्र बंद!!
मराठा आरक्षणावरून मराठा समाज आक्रमक झाला आहे. आरक्षणाच्या मुद्यावरून सकल मराठा समाजाने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. मराठा आंदोलकांकडून मुंबईतही बंद पाळण्यात येणार आहे. मराठा क्रांती महामोर्चा या बंदचे नेतृत्व करणार आहे. नाशिक, ठाणे आणि नवी मुंबई या तिनही शहरांमध्ये बंद पाळला जाणार नाही. सुरक्षेच्या कारणास्तव ठाणे-नवी मुंबईतील शाळा मात्र बंद ठेवल्या जाणार आहेत. या बंदमधून दूध, शाळा-महाविद्यालये आणि वैद्यकीय सेवांना वगळण्यात आले आहे. सकाळी ८ ते संध्याकाळी ६ या वेळेत हा बंद पाळण्यात येणार आहे. आरक्षणाच्या मुद्यावरून ५८ मोर्चे काढून देखील आरक्षण न मिळाल्याने मुक मोर्चाचे ठोक मोर्चामध्ये रूपांतर झाले. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, राजगुरूनगर, सातारामध्ये काढण्यात आलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले होते. त्यावेळी मराठा मोर्चामध्ये काही हिंसक प्रवृत्ती घुसल्याचे देखील पोलिसांनी म्हटले होते.
शांततेचे आवाहन
सकल मराठा समाजाने बंद शांततेमध्ये पार पाडण्याचे आवाहन केले आहे. यापूर्वी झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. त्यामुळे बंद शांततेमध्ये पार पाडा असे आवाहन सकल मराठा समाजाने केले आहे. बंदमुळे मुंबई सेंट्रल, कुर्ला आणि परळ या तिनही ठिकाणाचे एसटी आगार बंद ठेवण्यात आले आहेत.