राज्यात स्वप्नील लोणकर या युवकाचे आत्महत्या प्रकरण निवळले नसताना आता दुसरीकडे पुण्याच्या दौंड येथे एका २५ वर्षीय मल्हारी नामदेव बारवकर या युवकाने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. मल्हारी हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत होता. मात्र सतत रद्द होणाऱ्या परीक्षांमुळे मल्हारी नाराज होता. याच नैराश्यातून त्याने गळफास घेत आपले आयुष्य संपवले. मल्हारी हा पुण्यातील दौंड येथील देऊळगावागाडा येथे राहत होता. राहत्या घरीच त्याने आपले आयुष्य संपवले. आत्महत्या करण्यापूर्वी मल्हारीने एक चिठ्ठी लिहीली. त्या चिठ्ठीत त्याने त्याच्या आई वडिलांची माफी मागितली आहे. मल्हारीच्या पश्चात त्याचे आई वडिल आणि बहीण आहेत. मल्हारीच्या जाण्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे.
मल्हारीने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्याने म्हटले आहे की, ‘आई बाबा मी तुम्हाला दाखवलेली स्वप्ने पूर्ण करु शकत नाही आणि माझ्यामुळे मी तुमचा पडलेला चेहरा देखील पाहू शकत नाही. माझ्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये. माझ्या चांगल्या जगण्याचा सगळ्या आशा संपल्या आहेत. अतिविचार, संपलेला आत्मविश्वास त्यामुळे भविष्यात काही सकारात्मक करेन असे वाटत नाही. सॉरी’.
मल्हारीची ही आत्महत्या ह्रदयपिळवटून टाकणारी होती. मल्हारी फार हुशार विद्यार्थी होता. MPSC परीक्षेचे त्याने ३-४ पेपर दिले होते. मात्र मागील काही काळापासून परीक्षा पुढे ढकलल्याने तो फार नाराज होता. त्याच्या शिक्षणासाठी त्याच्या आई वडिलांनी त्यांची शेती विकली. मात्र परीक्षाच होत नसल्याने मल्हारी नैराश्यात गेला. आई वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नसल्याने त्याचे आत्महत्या करत त्याचे आयुष्य संपवले.
हेही वाचा – शरद पवारांना सहकार परिषदेचे निमंत्रण नाही!