सोमवारी मुंबईत लोकसभा निवडणूक होणार आहे. मात्र सलग सुट्ट्या आल्यामुळे राष्ट्रीय कर्तव्याला दांडी मारत मुंबईकरांनी थेट कोकणाची वाट धरली आहे. २७ ते २९ एप्रिलपर्यंत कोकणात जाणार्या सर्व रेल्वे गाड्या हाऊसफुल्ल झाल्या आहेत. मागील तीन दिवसांत लाखापेक्षा जास्त मुंबईकरांनी कोकण गाठलं असल्यामुळे मुंबईतील मतदानाची टक्केवारी पुण्याप्रमाणेच कमी होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सोमवारी मुंबईत मतदान होत आहे. मात्र शनिवारी, रविवार आणि सोमवार अशा सलग तीन दिवसांच्या सुट्ट्या आल्यामुळे कोकणात जाणार्यांची संख्या वाढली आहे. २७ ते २९ एप्रिलदरम्यान कोकणात जाणार्या रेल्वे गाड्या, खाजगी ट्रॅव्हल्स गाड्यांचे बुकिंग फुल झाले आहे. तसेच एसटी महामंडळांच्या गाड्यांच्या आरक्षणातही वाढ झाल्याची माहिती एसटी महामंडळाच्या अधिकार्यांनी दिली आहेत. विशेष म्हणजे कोकणात जाणार्या कोकणकन्या एक्सप्रेस, तुतारी एक्सप्रेस, दिवा- मडगाव एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस, रत्नागिरी पॅसेंजर आणि सावंतवाडी पॅसेंजर या गाड्यांचे आरक्षण फुल झाले आहे. तसेच कोकणात जाणार्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष उन्हाळी दोन स्पेशल गाड्या चालविल्या आहेत. त्यासुद्धा या कालावधीत हाऊसफुल्ल झाल्याची माहिती मध्य रेल्वेच्या एक अधिकार्यांनी दिली आहे.
अनेकांचे आरक्षण रद्द
कोकणात जाणार्या ८ रेल्वे गाड्या आहेत. ज्यामध्ये पॅसेंजर आणि मेल एक्सप्रेसचा समावेश आहे. कोकणात जाणार्या रेल्वेचे २७ ते २९ एप्रिलपर्यंत सरासरी ६० हजारांपेक्षा अधिक तिकीट आरक्षित झाली आहेत. अनेकांना आरक्षण मिळाले नसल्यामुळे तात्काळ तिकीटासाठी त्यांनी रेल्वे खिडक्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. इतकंच नव्हेतर कोकणात जाणार्या सर्व रेल्वे गाड्या या तीन दिवसांत क्षमतेपेक्षा जास्त भरून जात असल्याची माहिती रेल्वेचा अधिकार्यांनी दैनिक ‘आपलं महानगर’ला दिली आहे.
=================
हाऊसफुल रेल्वे गाड्या
=================
१ ) कोकणकन्या एक्सप्रेस
२ ) तुतारी एक्सप्रेस
३ ) दिवा- मडगाव एक्सप्रेस
४ ) मांडवी एक्सप्रेस
५ ) रत्नागिरी – पॅसेंजर
६ ) सावंतवाडी – पॅसेंजर
७ ) मत्स्यगंधा एक्सप्रेस
८ ) एर्नाकुलम मंगला लक्षद्वीप एक्सप्रेस
================
==========
रेल्वे गाड्याची प्रवासी क्षमता
क्षमता = १५००
प्रत्यक्षात = २३००
============