इगतपुरी : तालुक्यातील तळोघ ग्रामपंचायतमध्ये गेल्या दहा ते बारा महिन्यांपासून गाळ व जंतू असलेले पाणी पिण्यासाठी येत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत तळोघ ग्रामपंचायतीतील वॉर्ड क्र. २ व ३ मध्ये दूषित पाणी येत असल्याची तक्रार भोरू कडू, मच्छिंद्र गोईकणे व शशिकांत कडू यांनी गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांना अर्जाद्वारे निवेदन दिले आहे.
या अर्जात म्हटले आहे की, आम्ही वर्षभरापासून नळ कनेक्शन घेतले असून त्या नळाला गटाराचे पाणी व जंतूयुक्त पाणी येत आहे. याबाबत सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी सांगितले. मात्र त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे देऊन आमच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करत पंचायत समितीवर हंडामोर्चा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान एक हजार रुपये डिपॉझीट आणि ४८० रुपये पाणीपट्टी ग्रामस्थ भरत असून गटाराचे पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे अनेक साथींच्या रोगांना देखील आमंत्रण मिळत आहे. गावातीलच उपसभापती असताना त्यांना देखील समस्या मांडली मात्र त्यांनी देखील दुर्लक्ष केले. तेव्हा याबाबत समस्या कोणाकडे मांडाव्यात असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
गावाचे संरपच संतू रामा भगत हे फिटर कामासाठी सकाळी घोटीला जातात. उपसरपंच ठेकेदारी काम करतात व सदस्य त्यांची कामे करण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे या समस्या कोणाकडे मांडणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. गावातील कामच करायचे नसेल तर पद कशासाठी अडवायचे. मग लोकप्रतिनीधी कशाला फक्त पद मिरवायलाच का? की राजकारण करण्यासाठी.
– भोरू कडू, ग्रामस्थ, तळोघ