नाशिक: मागील दोन वर्षांत अपर आदिवासी आयुक्तांच्या कार्यक्षेत्रातील आश्रमशाळांमध्ये शिकत असलेल्या तब्बल १२५ विद्यार्थ्यांचा विविध कारणांनी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना मदत म्हणून आदिवासी विकास विभागाने प्रत्येक २ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान वितरीत करत काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो.
आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा शाळेत, घरी किंवा कुठेही कोणत्याही कारणाने मृत्यू झाला झाल्यास आदिवासी विभागाकडून त्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत केली जाते. पूर्वी ७५ हजार मदत दिली जात होती. मात्र, २०१८ नंतर हा मदतनिधी २ लाखांपर्यंत गेला. कोरोना काळात म्हणजे गेल्या दोन वर्षात नाशिक अपर आयुक्तांच्या कार्यकक्षेत येणार्या सातही प्रकल्प कार्यालयांमध्ये १२५ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्यात २०२०-२१ साली ६२ आणि २०१९-२० साली ६३ विद्यार्थी मृत झाले आहेत.
सर्वच विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना विभागाने अर्थसहाय्यातून सांत्वन करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, सुधारणा होऊन विद्यार्थी मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.
ही आहेत मृत्यूची कारणं..
आश्रमशाळांमधील बहुसंख्य विद्यार्थ्यांचा पालकांच्या ताब्यात असताना मृत्यू झाल्याचे सांगितलं जातं. यात अपघात, आजारपण, सर्पदंश, उंचीवरून पडल्याने, विहिरीत पडून अशा वेगवेगळ्या कारणांनी विद्यार्थ्यांचा मृत्यू होतो.