नाशिक : शेंद्रीपाड्याच्या पाणीप्रश्न माध्यमांनी आवाज उठवल्यानंतर खासदार हेमंत गोडसे यांनी स्थानिक विकास निधीतून सोलर डयुअल वॉटर पंपींग प्रकल्प लोकार्पण केले. त्यामुळे आदिवासी भागातील महिलांची होणारी पायपीट थांबण्यास मदत होणार आहे. मात्र, शुक्रवारी युवासेनाप्रमुख तथा राज्याचे पर्यावरणमंत्री येण्यापूर्वीच खासदार गोडसेंनी हा सोहळा उरकल्याने इतकी घाई कशासाठी असा प्रश्न कार्यकर्त्यांनी विचारला आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेंद्रीपाडा हा आदिवासी पाडा चर्चेत आला तो येथील पाणीप्रश्नावरून. गेल्या अनेक वर्षांपासून येथील महिला हंडाभर पाण्यासाठी जीवघेणा प्रवास करत असल्याचे विदारक दृश्य समोर आले. पाण्यासाठी महिलांची होणार्या कुचंबनेमुळे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे व्यथीत झाले. त्यांनी तातडीने दखल घेतल्याने येथे पूल बनविण्यात आला. त्यामुळे येथील महिलांची जीवघेणी कसरत थांबली. आदित्य ठाकरे यांनी मुंबईतून या गावाच्या समस्येची दखल घेतली; परंतु, या भागाचे प्रतीनिधीत्व करणार्यांच्या ती लक्षात येउ नये हे दुदैव यानंतर ठाकरे यांनी येथील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींना आदेश दिले.
त्यानूसार खासदार गोडसे यांनी स्थानिक विकास निधीतून पाड्यावर सोलर डयुअल वॉटर पंपीग प्रकल्प उभारला. या प्रकल्पाचे २४ जानेवारी रोजी लोकार्पण सोहळाही उरकण्यात आला. मात्र, ज्या आदित्य ठाकरे यांच्या प्रयत्नातून हा प्रश्न मार्गी लागला त्यांच्याच हातून हा सोहळा होणे आवश्यक असल्याचे मत काही सेना पदाधिकार्यांनी व्यक्त केले. २७ जानेवारी रोजी नाशिक दौर्यावर असलेल्या आदित्य ठाकरेंना टाळून हे लोकार्पण करण्यात आल्याने प्रकल्पाच्या उदघाटनाची घाई कशासाठी असाही सुर उमटू लागला आहे. काही दिवसांपूर्वी उड्डाणपुलाचाही असाच मुद्दा उपस्थित झाला होता.
- यापूर्वीही विविध प्रकल्पांच्या उदघाटनावरून सेना भाजपांतर्गत स्पर्धा रंगलेली दिसून आली आहे. यापूर्वी के.के.वाघ जवळील उदघाटन सोहळाही कामे अर्धवट असतांना उरकण्यात आला. व्दारका ते नाशिकरोड प्रस्तावित उडडाणपुलावरूनही सेना भाजप लोकप्रतिनिधींमध्ये श्रेयवाद रंगलेला दिसून आला.