तीन-चार दिवसांपासनं सुरू असलेल्या संततधारेमुळे पंचवटीतून जाणार्या मुंबई-आग्रा महामार्गावर चिखलाचं साम्राज्य निर्माण झालंय. दुभाजकातली माती वाहून येत असल्यानं दरवर्षी पावसाळ्यात चिखल निर्माण होऊन अपघात होतात. मात्र, अद्यापही महामार्ग प्राधिकरणाने यावर कायमस्वरुपी तोडगा काढलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून चिखलमय झालेल्या महामार्गामुळे दररोज सुमारे ४० ते ५० अपघात घडताहेत.
आज घडलेल्या अशाच एका अपघातात दुचाकी घसरुन लहान मुलासह महिला जखमी झाली. सुदैवाने पाठीमागून वाहन नसल्यानं मायलेक बालंबाल बचावले. उड्डाणपूलाच्या कामामुळे आधीच हा संपूर्ण रस्ता खड्ड्यांत गेल्यानं वाहनधारक प्रचंड त्रस्त झालेत. राजकीय नेत्यांनी तरी या समस्येकडे लक्ष द्यावं, अशी आग्रही मागणी केली जातेय.
भुजबळांनी टोचले आयुक्तांचे कान
महामार्गावरील अपघातांच्या बाबतीत पालकमंत्री छगन भुजबळ यांना विचारले असता त्यांनी महापालिकेने याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे सांगितले. केवळ दुसर्या विभागाकडे बोट दाखवून चालणार नाही अशी तंबीही त्यांनी यावेळी दिली. तसेच पुलाखालील अतिक्रमण तात्काळ हटविण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले. मात्र अतिक्रमण काढूनही पुन्हा या ठिकाणी व्यावसायिक बसतात असे सांगताच मग पुन्हा काढा कारणे देऊ नका असे खडेबोलही त्यांनी आयुक्त कैलास जाधव यांना सुनावले.