दिलीप कोठावदे : नवीन नाशिक
अवघ्या आठवडाभरात २०२१ हे वर्ष संपून २०२२ ची सुरुवात होणार आहे. नवीन वर्षात सर्व काही चांगले व्हावे,
गेल्या वर्षभरात घडलेल्या वाईट घटना विसरून पुढे जावे असे प्रत्येकालाच वाटत असते. मात्र, ज्योतिषशास्त्रानुसार येणारे वर्ष कसे असेल ? या प्रश्नाचे उत्तर सर्व ग्रहांची स्थिती ठरवत असते. २०२२ बद्दल बोलायचे झाले तर या वर्षाच्या सुरुवातीलाच कालसर्प योग तयार होत आहे, त्यामुळे जागतिक पातळीवर आगामी काळात मोठे उलटफेर होण्याची चिन्हे आहेत.
नवीन वर्ष २०२२ ला कन्या आणि वृश्चिक राशीच्या पार्श्वभूमीवर प्रारंभ होत आहे. वर्षाच्या सुरुवातीस, हस्त नक्षत्राच्या पहिल्या चरणात आरोही स्थान असेल आणि चंद्र ज्येष्ठ नक्षत्राच्या पहिल्या चरणात असेल. ग्रहांच्या या स्थितीनुसार येणारे वर्ष नोकरदार आणि बुद्धीजीवी लोकांसाठी विशेष महत्त्वाचे ठरणार आहे. ज्योतिष अभ्यासकांच्या मते नशिबावर अवलंबून असणार्यांची यावर्षी निराशा होईल. वर्षाच्या सुरुवातीला होणारा कालसर्प योग मोठी संकटे व अनेक देशातील अंतर्गत व परस्पर संबंधात कलह निर्माण करणार असल्याचे द्योतक आहे. तर भारतासाठी प्रगतीचे वर्ष असणार आहे. तेव्हा जाणून घेऊ या कसे असेल २०२२ हे वर्ष….
मोठ्या संकटांची चाहूल
ज्योतिषाचार्य अनिल चांदवडकर यांच्या मते, २०२२ च्या प्रारंभीच रात्री १२-२० वा. जागतिक कुंडलीत कालसर्प योग तयार होत आहे. ज्यात राहूचे मुख भाग्य स्थानात आहे तर केतुची स्थिरता चंद्र आणि मंगळा सोबत बलवान घरात आहे, ज्यामुळे पृथ्वीवर चिंताजनक परिस्थिती असेल. अनेक देशांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागू शकतो. मुसळधार पाऊस,अतिवृष्टी, महापूर अशी परिस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेची हानी होण्याची शक्यता निर्माण होते. भूकंप किंवा त्सुनामीचीही चिन्हे आहेत.
शिक्षण, आरोग्य
शिक्षण आणि आरोग्यासाठी हे वर्ष संमिश्र असणार आहे. शिक्षणाबाबत बोलायचे झाले तर येत्या वर्षभरात शैक्षणिकदृष्ट्या विद्यार्थ्यांचे सकारात्मक परिणाम दिसून येतील. गेल्या काही वर्षांत कोरोनामुळे विस्कळीत झालेली शिक्षणाची परिस्थिती यावर्षी पूर्णतः मार्गी लागण्याची अपेक्षा आहे. दुसरीकडे आरोग्याच्या दृष्टिकोनातून येत्या वर्षभरात परिस्थिती सामान्य दिसत असली तरी कोरोनाकडे दुर्लक्ष करणे घातक ठरू शकते. विशेषतः लहान मुलांच्या आरोग्य रक्षणासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
आर्थिक स्थिती
आर्थिक दृष्टिकोनातून आगामी वर्ष मागील वर्षांपेक्षा चांगले असेल. कोरोनाने विस्कळीत झालेल्या व्यवस्थांना यंदा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली होण्याचीही दाट शक्यता आहे.
नाशिकमधील ज्योतिष अभ्यासक नरेन्द्र धारणे यांच्या मते, ज्या-ज्या वेळी कुंडलीत कालसर्प योग येतो, त्यावेळी अशा व्यक्तीचे जीवन अतिशय संघर्षमय असते. त्यामुळे ज्योतिषीय अभ्यासानुसार २०२२ या वर्षात जागतिक स्तरावर अनेक देशांमध्ये अंतर्गत व आंतरराष्ट्रीय कलह, उलथापालथ होण्याची शक्यता अधिक आहे. २२ अंकांची बेरीज ४ येते, कुंडलीत ४ अंकावर हर्षल ग्रहाचा प्रभाव असतो,त्यामुळे या वर्षात अचानक व अनपेक्षित घडणार्या घटनांचे प्रमाण अधिक असेल. वातावरणातील बदल, नैसर्गिक आपत्ती बरोबरच अग्नीशी संबंधित घटना मोठ्या संख्येने होण्याची शक्यता आहे. जागतिक स्तरावर वातावरण अस्थिर असेल.तसेच बॉम्ब स्फोट, जाळपोळ,अग्नितांडव, हत्या, दहशतवादी कारवाया, यातून जीवितहानी होण्याची शक्यता आहे. तालिबान,पाकिस्तानसारख्या ठिकाणी अंतर्गत कलह व सत्ताबदल होऊ शकतो.
भारतासाठी प्रगतीचे वर्ष
भारताची रास धनु असून धनु व मकर राशी एकमेकांना पुरक आहेत. सद्यस्थितीत भारत साडेसातीच्या प्रभावाखाली असून मकर राशीसाठी साडेसाती शुभकारक असल्याने भारतासाठी आगामी वर्ष प्रगतीचे राहील. जगाच्या उपयोगी पडतील, असे नवीन शोध-संशोधने होतील तसेच प्रगतीच्या अनेक नवनवीन गोष्टी घडतील. आंतरराष्ट्रीय पातळीवर घडणार्या घटनांचा परिणाम भरतावरही होईल मात्र त्याची तीव्रता कमी असेल.