नाशिक शहरात सध्या ‘ओला दुष्काळ’ सदृश्य परिस्थिती असताना मखमलाबाद परिसरात मात्र नागरिकांना अजूनही टँकरने पाणी मागवावे लागत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे पाण्याअभावी प्रचंड हाल होत आहेत.शहरात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे.गोदावरी नदी दुथडी भरुन वाहत आहे. गंगापूर धरणही पूर्णत: भरल्याने विसर्ग सोडला जात आहे. त्याचप्रमाणे शहरात ठिकठिकाणी पाणी साचलेले दिसत आहे.
एकीकडे शहरात सर्वत्र पाणीच पाणी दिसत असताना दुसरीकडे मखमलाबाद येथील रहिवाशांना मात्र महापालिकेच्या पाण्यावर अवलंबुन रहावे लागत आहे. परिसरात सकाळी ९ वाजेच्या सुमारास एक वेळेच परिसराला पाणीपुरवठा होतो. त्यातच तो अतिशय कमी दाबाने होत असल्याने नोकरदार वर्गाचे कमालीचे हाल होत आहेत.
मखमलाबाद परिसरात नवीन वसाहती स्थापन होत आहेत. परंतु या वसाहतींना पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. सकाळी नोकरदारांची कामावर जाण्याची घाईगर्दी असते परंतु पुरेशा दाबाने पाणी येत नसल्याने सगळ्यांचीच तारंबळ उडते. महिला वर्ग तर पुरता हतबल झाला आहे.
– मीनल मेधने, रहिवासी