विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी आज चंद्रपूर शहरात अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीची पाहणी केली. चंद्रपूर शहरातील सिस्टर कॉलनी आणि रहमत नगर परिसरात अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध उपाययोजना करण्याबाबतच्या सूचना अजितदादांनी केल्या.
यावेळी अजितदादा पवार म्हणाले की, चंद्रपूर जिल्ह्यामधील १५ तालुक्यांना अतिवृष्टीचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. धान, कापूस, सोयाबिन, तूर आणि भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ६२ ते ६३ हजार हेक्टर क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झालेले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या साधारण एक लाख असेल, असा अंदाज आहे. तसेच चंद्रपूर शहरातील समस्या वेगळ्या आहेत. ओढे आणि नदीत अतिक्रमण झाल्यामुळे शहरी भागात पूर परिस्थिती निर्माण होत आहे. नागरी भागात ओढे बुजविल्यामुळे कठिण परिस्थिती उद्भवली असल्याने महानगरपालिकेच्या नियोजनशून्य कारभारावर देखील मा. अजितदादांनी टीका केली.
चंद्रपूर शहरात नुकसान झालेल्या घरांनाही मदत दिली पाहीजे, असे सांगताना मा. अजितदादा पवार म्हणाले की, २०१३ रोजी अतिवृष्टी झाली असताना शासनाने ५ हजारांची मदत केली होती. आता २०२२ मध्ये आपण आहोत, आता कमीत कमी दहा हजारांची मदत केली पाहीजे, अशी मागणी त्यांनी केली.