घरमहाराष्ट्रपुणे-नागपूरचे निकाल म्हणजे महाविकास आघाडीला लोकांचा पाठिंबा - शरद पवार

पुणे-नागपूरचे निकाल म्हणजे महाविकास आघाडीला लोकांचा पाठिंबा – शरद पवार

Subscribe

धुळे-नंदुरबारचा विजय वगळता विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत अनपेक्षितपणे भाजपला मोठा फटका बसला आहे. महाविकास आघाडीने या निवडणुकीत चांगले काम केले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. धुळे आणि नंदुरबारचा निकाल आश्चर्यकारक नाही. कारण त्या ठिकाणचे उमेदवार हे विद्यमान आमदार होते. त्यांनी पक्षांतर केल्यामुळे राजीनामा दिला आणि पुन्हा निवडणूक लढवली. त्यामुळे त्यांचा विजय खरा विजय म्हणता येणार नाही. पण बाकीच्या ठिकाणचा निकाल हा महाविकास आघाडीच्या एकजुटीचा आणि गेल्या वर्षभरात केलेल्या कामाला मतदारांनी दिलेली पावती आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.

पुणे, औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी भाजपला टोला लगावला आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघ ५ दशके भाजपकडे होता. गडकरी आणि फडणवीस यांच्याकडे ही जागा गेली अनेक वर्ष होती. शिवाय, पुण्यातील पदवीधर मतदारांनीही आम्हाला समर्थन दिले नव्हते. पण यंदा पुण्याचा निकालही मोठ्या मतांनी स्पष्ट झाला आहे. या बदल म्हणजे महाराष्ट्रातील चित्र बदलत आहे. या बदलाला महाराष्ट्रातील लोकांचा पाठींबा आहे, असेच या निकालातून पाहायला मिळत आहे, असे शरद पवार म्हणाले.

- Advertisement -

चंद्रकांत पाटील यांचा विनोदी विधान करणाचा लौकिक

चंद्रकांत पाटील यांचा विनोदी विधान करणाचा लौकिक आहे. मागच्यावेळी आमच्यामध्ये एकापेक्षा जास्त उमेदवार होते त्यामुळे ते विजयी झाले. यावेळी त्यांना अंदाज होता म्हणून त्यांनी पुणे शहरातील त्यांच्या दृष्टीने सोयीचा मतदारसंघ निवडला. चंद्रकांत पाटील यांना विश्वास असता तर त्यांनी मतदारसंघ बदलला नसता, असा टोला शरद पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे. त्याचबरोबर चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याला महत्व देण्याची गरज नसल्याचेही पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -