आपल्या बापाचा वारसा आपण चालवत असतो. मात्र जो माणूस रोज नेते बदलतो तो आदर्श निर्माण करु शकत नाही.
गोपीनाथ मुंडे यांनी कधीच कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही. मुंडे साहेबांच्या राजकारणाचा वारसा हा फक्त त्यांच्या भाषण करण्याच्या शैलीवरुन ठरत नसतो. तर वारसा रक्तातच असावा लागतो, अशी टीका पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर केली आहे. काल १२ डिसेंबर रोजी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा जन्मदिन होता. त्यामुळे गोपीनाथगड येथे दोन दिवसीय मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबीराप्रसंगी संबोधित करताना पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता त्यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले.
“काही लोक गोपीनाथ मुंडे यांचा वारस असल्याची बतावणी करत आहेत. मात्र त्यांच्या मुली असूनही कदाचित वारस बनू शकत नाही. पण मुंडे साहेबांचा आदर्श माननारा या गर्दीतील कोणताही व्यक्ती त्यांचा वारसा होऊ शकतो. मुंडे साहेबांनी कधी कुणालाही नखानेही ओरखडले नाही. मुंडे आणि विलासराव एकदा म्हणाले होते की, आम्ही एकमेकांच्या विरोधात आहोत. मात्र आम्ही शत्रुत्व कधीच ठेवले नाही. तसsच मी देखील कुणावरही वैयक्तिक शत्रुत्व ठेवणार नाही”, असा टोला पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना लागवला.
लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांचा जयंती कार्यक्रम.
Posted by Pankaja Gopinath Munde on Wednesday, 12 December 2018
मुंडेंनी मुंबईचे गँगवॉर संपवले, मी बीडचे
यापुढे जात पंकजा मुंडे म्हणाल्या की, मुंडे साहेबांनी मुंबईतील गँगवॉर संपुष्टात आणले. बीड जिल्ह्यातले गँगवॉर संपवण्यात मी आतापर्यंत चांगले काम केलेले आहे. यामध्ये बीड जिल्ह्यातल्या लोकांचेही मोठे योगदान आहे.
तसेच काल पाच राज्यात निवडणुकांचा निकाल लागला. याबद्दलही पंकजा मुंडे यांनी भाष्य केले आहे. “भाजपचा या निवडणुकीत पराभव झाला असला तरी आम्ही आज त्याची चर्चा करणार नाही. कारण चार टर्म सत्ता भोगलेल्या राज्यातील ते निकाल होते. त्यामुळे आम्ही महाराष्ट्रात जेव्हा चार टर्म सत्ता भोगू, तेव्हा आम्ही महाराष्ट्रात याची चर्चा करु”, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. तसेच ज्या नेत्यांना तालुक्याच्या बाहेर कुणी विचारत नाही. त्यांच्या पक्षाचे नाव महाराष्ट्राबाहेर कुणाला माहित नाही. ते भाजपच्या पराभवाची चर्चा करत आहेत, असेही त्या म्हणाल्या.