रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी भाजपाकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. अब की बार 400 पार असा नारा भाजपाकडून देण्यात आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील तेच तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. पण आता भाजपाच्या नेत्याने पंतप्रधानांबद्दल केलेल्या एका विधानामुळे राज्यासह देशभरात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचे विधान भाजपाचे ज्येष्ठ नेते मधुकर चव्हाण यांनी केले आहे. (PM Narendra Modi Sensational statement of BJP leader Madhukar Chavan)
महायुतीकडून रत्नागिरी सिंधुदुर्ग येथील उमेदवाराची घोषणा झालेली नसली तरी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे या लोकसभेतून नाव जवळपास निश्चित झाले आहे. ज्यामुळे भाजपाकडून या लोकसभेत प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. काल शुक्रवारी (ता. 12 एप्रिल) मधुकर चव्हाण यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील गुहागर येथे भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचे धक्कादायक विधान केले. ज्यानंतर आता चव्हाणांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून पंतप्रधानांच्या जीवावर कोण उठले आहे? असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे.
सावध व्हा, घड्याळाचे काटे पुन्हा उलटे फिरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यास भारत जगात शक्तिशाली होईल या भीतीने पंतप्रधान मोदी यांच्या हत्येचा कट रचला जात आहे. कमळ हा आपला प्राण तर घड्याळ हा आपला श्वास आहे. पुढील महिनाभर घड्याळ नजरेसमोर ठेऊन कामाला लागा. आपल्याला मोदींसाठी हात वर करणारा खासदार हवा आहे, असे धक्कादायक विधान भाजपा नेते मधुकर चव्हाण यांनी केले.
तसेच, यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत म्हटले की, अनंत गीते तुम्ही कोणाच्या नेतृत्वाखाली काम करत आहात? तुमचे नेतृत्व उध्दव ठाकरे हे लाचार आहेत. बाळासाहेब ठाकरे हे आयुष्यात कोणासमोर झुकले नाहीत. पण उद्धव ठाकरे तुम्ही औरंगजेबासमोर झुकलात. सोनिया गांधी आणि शरद पवारांसमोर झुकलात, अशी टीका चव्हाण यांनी केली. तर, शरद पवार यांनी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती बिघडवली. मनोज जरांगे पाटील यांच्या मागे शरद पवारच आहेत. स्वतःला जाणता राजा म्हणवणाऱ्या शरद पवार यांना राजा कसा असतो हे माहिती आहे का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.