पुण्यातील येरवड्यातील शास्त्रीनगर भागात शुक्रवारी बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याने 5 मजुरांचा दुर्वैवी मृत्यू झाला. याप्रकरणी पुणे पोलिसांनी ब्लू ग्रास बिझनेस पार्क कंपनीसह अहलुवालिया कन्स्ट्रक्शनवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी यासंदर्भात माहिती दिली होती. आता या प्रकरणी आणखी काही संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे पोलिसांनी याप्रकरणी येरवडा गुन्हा दाखल करत चौघांना अटक केली आहे. सिनिअर सेफ्टी सुपरवायझर इमतियाज अबुल बरकात अन्सारी, लेबर कॉक्ट्रक्टर सुपरवायझर मोहम्मद आलम,प्रोजक्ट मॅनेजर असिस्टंट विजय धाकतोडे, प्रोजक्ट मॅनेजर मजीद खान अशी अटक केलेल्या चार आरोपींची नावे आहेत. जखमी कामगाराने केलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील शास्त्रीनगर भागात 3 फेब्रुवारी रोजी रात्री बांधकाम सुरु असलेल्या इमारतीमध्ये लोखंडी जाळी बसवण्याचे काम सुरु होते. यावेळी दहा, बारा मजूर त्याठिकाणी काम करत होते. मात्र काम सुरु असताना लोखंडी जाळीखाली असलेल्या मजुरांच्या अंगावर कोसळली. त्याखाली दहा मजूर अडकले. या दुर्घटनेनंतर जवळपास दोन तास मदत कार्य सुरु करुन दुर्घटनाग्रस्त मजुरांना आणि मृतांना बाहेर काढण्यात आले. यात 5 कामगारांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या घटनेची दखल घेत दुर्घटनाग्रस्त जखमी मजुरांवर तातडीने उपचार करण्याचे आणि दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत.