घरमहाराष्ट्रमंदिरे शेवटी उघडून सरकारने उगाच पुरोगामीत्व दाखवू नये

मंदिरे शेवटी उघडून सरकारने उगाच पुरोगामीत्व दाखवू नये

Subscribe

सध्या महाविकास आघाडी सरकारचे काही बाबतीतील धोरणशैथिल्य हे फारच बुचकळ्यात टाकणारे आहे. या सरकारच्या डोळ्यावर कुठल्या गुंगीची झापड आली आहे की ज्यामुळे गेले अनेक दिवस श्रद्धाळू हिंदू भाविकांचा सुरू असलेला कंठशोष सरकारच्या कानावर पडत नाहीये? या सरकारला मंदिरे उघडण्याच्या बाबतीत इतका आकस का आहे? सरकारने मंदिरे सगळ्यात शेवटी उघडून उगाच नको ते पुरोगामीत्व दाखवू नये.सरकारने जर ह्या विषयी लवकरात लवकर सकारात्मक पाऊल उचलले नाही तर आम्हाला नाईलाजाने सरकारच्या आदेशांना झुगारून मंदिर प्रवेश करावा लागेल, असा इशारा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित दिला आहे.

महाराष्ट्रात मंदिरे उघडण्याबाबत राज ठाकरे यांनी हे पत्र लिहिले आहे. राज ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे की, ‘अनलॉक’ क्रमांक अमुक तमुक अशा ‘अनलॉक’ प्रक्रियेचे अनेक टप्पे सुरू आहेत, मॉल्स उघडले जात आहेत, सार्वजनिक कार्यक्रमातील लोकांची उपस्थिती 100 करण्याची परवानगी दिली जात आहे आणि या सगळ्यात भक्तांची आणि देवांची ताटातूट सुरूच आहे. असे का? या सरकारला मंदिरे उघडण्याच्या बाबतीत इतका आकस का आहे?, असे राज ठाकरेंनी म्हटले आहे.

- Advertisement -

राज ठाकरे पत्रात पुढे म्हणतात, कोरोनामुळे जेव्हा अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प होते, तेव्हा मंदिरे बंद ठेवण्याच्या सरकारच्या निर्णयाचे आम्ही देखील समर्थन केले होते; पण आज जेव्हा दैनंदिन जीवन सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असताना नेमके महाराष्ट्रातच देवळे का बंद ठेवली जात आहेत? जर मॉल आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी सरकार निर्बंध शिथिल करताना काही नियमांची चौकट आखून देऊ शकते तर तशीच चौकट मंदिर प्रवेशासाठी देखील असू द्या. आणि लॉकडाऊनच्या काळात आषाढीची वारी असो, गोपाळकाल्याचा उत्सव असो की गणेशोत्सव असो राज्यातील हिंदू बांधवांनी कमालीचे सामंजस्य दाखवले आहे, सरकारच्या आदेशांचे अत्यंत समजूतदारपणाने पालन केले आहे. त्यामुळे उद्या मंदिरे उघडली तर या राज्यातील माझा हिंदू बांधव आखून दिलेले नियम काटेकोरपणे पाळेल याची मला खात्री आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

मंदिरे सुरू करणे म्हणजे निव्वळ काही भक्तांच्या पुरता हा विषय मर्यादित नाही, इथे त्यात देवाची सेवा करणारे पुजारी असोत, गुरव असोत की त्या मंदिरावर अवलंबून असणारी एक छोटीशी अर्थव्यवस्था असो ह्यांचा सरकार विचार करणार आहे का नाही? मध्यंतरी माझ्याकडे त्र्यंब्यकेश्वर मंदिराचे पुजारी आले होते त्यांनी हीच व्यथा माझ्याकडे मांडली. एका मंदिरावर त्या गावाची, त्या शहराची अर्थव्यवस्था अवलंबून असते ती अर्थव्यवस्थाच जर कोलमडणार असेल तर त्यांनी साकडे घालायचे कोणाकडे? असे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

गेले 5 महिने सगळे अर्थकारण ठप्प आहे, लोकांच्या नोकर्‍या गेल्या आहेत, व्यवसाय पार बुडालेत, त्यामुळे आतातरी सरकारने निर्बंध शिथिल करून, सार्वजनिक वाहतुकीचे नीट नियोजन करून या अर्थकारणाला धुगधुगी द्यावी अशी जनतेची अपेक्षा आहे. ह्यासाठी लोकांनी सरकारकडे विनंत्या, आर्जवे केली, टाहो फोडला; पण सरकार स्वतःच्या धुंदीत तल्लीन झाले आहे. त्यामुळे ‘देव तारी त्याला कोण मारी’ ह्या अंतिम श्रद्धेतून त्यांना त्यांच्या ईश्वराला साकडे घालायचे आहे, देवा ह्या अस्मानी, सुलतानी संकटातून सोडव असे आर्जव करायचे आहे आणि म्हणूनच सरकारने देव आणि त्याचे भक्त यांची ताटातूट करण्याच्या फंदात पडू नये, असे त्यांनी म्हटले आहे.

त्यामुळे सरकारने मंदिरे सगळ्यात शेवटी उघडून उगाच नको ते पुरोगामीत्व दाखवू नये. त्यापेक्षा एक नियमावली आखावी आणि हिंदुजनांच्या मंदिर प्रवेशाचा मार्ग मोकळा करावा. पण तरीही सरकारने जर ह्या विषयी लवकरात लवकर सकारात्मक पाऊल उचलले नाही तर आम्हाला नाईलाजाने सरकारच्या आदेशांना झुगारून मंदिर प्रवेश करावा लागेल; पण मी आशा करतो की ही वेळ सरकार आमच्यावर येऊ देणार नाही, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला आहे.

मंदिरे उघडली जावीत ही उद्धव ठाकरेंची मनापासून इच्छा आहे. योग्य वेळी निर्णय घेण्याची त्यांची मानसिकता आहे. सगळे बंद करण्याची उद्धव ठाकरेंना काही हौस नाही. मंदिराबाबत सरकार लवकरच निर्णय घेण्याच्या मनस्थितीत आहे.
-संजय राऊत, खासदार, शिवसेना.

मंदिरे आणि धार्मिक स्थळे उघडण्याच्या विनंत्या येत आहेत. मात्र, त्याविषयी सावधानता बाळगावी लागणारच आहे.
-उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -