मुंबई : ‘मोदी की गॅरंटी’, ‘मै भी चौकीदार’ असे लिहित निवडणुकीच्या काळात भाजपाच्या नेत्यांनी मागील 10 वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जोरदार प्रचार केला आहे. त्यामुळे आता ‘मोदी का परिवार’ असे लिहित भाजपा नेते पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात प्रचाराच्या कामाला लागल्याचे पाहायला मिळत आहे. ज्यामुळे आता या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. ‘मोदी का परिवार’ या थापेवर आता जनता पुन्हा फसणार नाही, असे म्हणत राऊतांकडून टीका करण्यात आली आहे. (Sanjay Raut criticizes PM Narendra Modi over the ‘Modi ka Parivar’ issue)
हेही वाचा… Thackeray group : मोदी-शहांच्या टगेगिरीपुढे न झुकणारा नेता म्हणजे…, ठाकरे गटाचा निशाणा
प्रसार माध्यमांसमोर खासदार संजय राऊत म्हणाले की, 2019 मध्ये ‘मै चौकीदार’ आणि आता काय तर ‘मेरा परिवार’. पण देशातील 140 कोटी जनतेचे कुटुंब कोणत्या हाल अपेष्टा भोगत आहे, याची माहिती मोदींना आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबामध्ये मणिपूर येत नाही का? असा प्रश्न आमच्याकडून विचारण्यात आला आहे. मणिपूर जळत आहे, मणिपूरमधील अनेक कुटुंब रस्त्यावर आहेत. मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढली जात आहे. तिथे लोकांना रस्त्यावर मारले जात आहे, ते मणिपूर तुमच्या कुटुंबात येत नाही का? तर, काश्मिरी पंडित हे तुमचे कुटुंब नाही का? त्यांना पुन्हा आणण्यासाठी आपण 2014 आणि 2019 ला आश्वासने दिली होती. पण अद्यापही ते आलेले नाही, त्यामुळे लाखो काश्मिरी पंडित तुमच्या कुटुंबात येत नाही का? असे प्रश्न उपस्थित करत राऊतांकडून टीका करण्यात आली आहे.
तर, मूठभर श्रीमंत लोक, धनिक लोक, ठेकेदार हे मोदींचे कुटुंब आहे. त्यांचे कुटुंब हे पक्ष फोडणाऱ्यांचे कुटुंब आहे. त्यांचे कुटुंब हे लुटमार करणाऱ्यांचे कुटुंब आहे, हे आता स्पष्ट झाले आहे. अशा गोंडस नावाखाली हे लोकांना फसवू पाहात आहेत. परंतु, त्यांच्या या परिवारवादाच्या जाहिरातीला, प्रसिद्धीला जनता बळी पडणार, असेही संजय राऊत यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. या देशातील अनेक कुटुंब हे सरकारकडून फेकलेल्या पाच किलोंच्या धान्यावर जगत असल्याचा आरोप करत राऊतांकडून सडकून टीका करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत आल्यानंतर जनतेला भिकारी केले आहे. 80 कोटी जनतेला हे लोक रोजगार देऊ शकलेले नाही. वर्षाला दोन कोटी लोकांना रोजगार देण्यात येणार होता. पण ते अद्यापही देऊ शकलेले नाही, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबातील लोक बेरोजगार आहेत. पण त्याबदल्यात त्यांनी पाच किलो धान्य भिकाऱ्यासारखे फुकट देण्याचे काम केले आहे. हे त्यांचे कुटुंब आहे. जो गरीब आहे, त्याला अधिक गरीब करून भीक मागायला लावायचे, हे त्यांचे कुटुंब आहे, अशी जहरी टीका राऊतांकडून भाजपा आणि मोदींवर करण्यात आली आहे.