राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरळीत माझ्याविरोधात विधानसभा निवडणूक लढवून जिंकून दाखवावी, अन्यथा पेलत नसेल तर मी ठाण्यात येऊन लढतो असं खुलं आव्हान शिवसेना नेते ( ठाकरे गट) आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं होतं. शिंदे गटाने या आव्हानानंतर ठाकरे गटावर जोरदार हल्ला केला, यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील शिंदे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरेंच आव्हान आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देऊन वरळीत यावं…आम्ही संध्याकाळपर्यंत वाट बघतोय की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा देऊन येतात की, त्यांच्या फौजफाट्यासह येतात. 32 वर्षाच्या तरुणाला सरकार कसं घाबरतं हे आज वरळीमध्ये महाराष्ट्र पाहिलं, असं आव्हान संजय राऊत यांनी दिलं आहे.
संजय राऊत म्हणाले की, राज्य सरकारचे दिल्लीपासून महाराष्ट्रात सर्वत्र लग्न सोहळे सुरु आहेत. वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे हे आमच्या 32 वर्षाच्या नेत्यानं आव्हान दिलं आणि त्यानंतर महाराष्ट्रात जो काही राजकीय भूकंप घडायला लागला तो अत्यंत मजेशीर आहे. आज वरळीमध्ये एकटे मुख्यमंत्री येत नाही तर जोडीला उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनाही घेऊन येत आहेत म्हणजे पहा किती गांभीर्याने घेतलं आहे त्यांनी… आनंद आहे… पण आदित्य ठाकरेंनी जे आव्हान दिलं आहे त्या आव्हानासंदर्भात आम्ही ठाम आहोत, असही राऊतांनी ठणकावून सांगितले.
शिंदे फडणवीस सरकारचेचं लोकं कोळ्यांच्या वेषात येऊन खुर्च्यांवर बसतील
यावर राऊत पुढे म्हणाले की, आदित्य ठाकरे असही म्हणाले की, तुम्ही राजीनामा द्या. त्यांनी राजीनामा देऊन वरळीत यायला हवं. मुख्यमंत्री म्हणून येऊन सगळा लवाजमा घेऊन वरळीत आपण येणार आहात. म्हणजे त्यांचे 1000 – 1200 पोलीस त्या खुर्च्यांवर बसणार आणि आपले पोलीस आले की, काय होतं आपल्याला माहिती आहे. वर्ध्याच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात साहित्य संमेलनाचे बुजूर्ग अध्यक्ष माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनाच पोलिसांनी अडवलं आणि कार्यक्रमास्थळी जाऊन दिलं नाही, अशी यांची पोलिसांची यंत्रणा आहे. त्यामुळे वरळीत सुद्धा कोळी समाजाला अडवून, यांचेच लोकं कोळ्यांच्या वेषात येऊन खुर्च्यांवर बसतील, पण आनंद आहे या निमित्ताने मुख्यमंत्र्यांचे, उपमुख्यमंत्र्यांचे पाय जमिनीला लागतायत असा टोलाही राऊतांनी शिंदे फडणवीस सरकारला लगावला आहे.
वरळीत मुख्यमंत्र्यांच्या कवच कुंडलामध्ये मोदी सेना येणार
दरम्यान भाजप नेत्यांनी आदित्य ठाकरेंनाही राजीनामा देऊन पुन्हा वरळीतून निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं होतं. या आव्हानावर बोलताना राऊत म्हणाले की, यात भाजपलामध्ये पडण्याची गरज नाही. याला मराठी भाषेत चोमडेपणा म्हणतात. स्वत: मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, आम्ही मोदींची माणसं आहोत, शिवसेनेशी काही संबंध नाही. त्यामुळे वरळीत मुख्यमंत्र्यांच्या कवच कुंडलामध्ये मोदी सेना येणार आहे, त्यामुळे भाजपने चोमडेपणा करणं अपेक्षित नाही, अशी टीकाही राऊतांनी केली आहे.