केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CMUddhav Thackeray) यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर राज्यात शिवसेना आणि भाजप आमनेसामने आले. एकेकाळी युतीत असलेले पक्ष एकमेकांना भिडत असल्यामुळे आता शिवसेना-भाजप एकत्र येणार का? अशा चर्चा सुरु आहेत. यावर शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना शिवसेना आणि भाजपचे संबंध सुधारण्यासाठी महान माणसाला नेमलं आहे, असा टोला राऊत यांनी राणेंना लगावला.
संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना दुसऱ्या पक्षांमधून भाजपमध्ये आलेल्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला. इतर पक्षांमधून भारतीय जनता पक्षात आलेल्या बाटग्यांना इतिहासाचे धडे द्यायला हवेत. भाजपनं त्यांना वेळीच आवरण्याची गरज असल्याचं राऊत म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कानशिलात लगावण्याची, शिवसेना भवन फोडण्याची भाषा भाजपचे मूळ नेते कधीही करणार नाहीत. पण भाजपमध्ये इतर पक्षांमधून दाखल झालेले बाटगे ती भाषा वापरत आहेत. गटर पॉलिटिक्स असो वा लेटर पॉलिटिक्स, तुम्ही शिवसेनेचा मुकाबला करू शकत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा, असा इशारा राऊत यांनी दिला.
दोन्ही पक्षांमधला हिंदुत्वाचा धागा कायम
भाजपमध्ये आलेल्या बाटग्यांना इतिहास शिकवण्याची गरज असल्याचं म्हणत राऊतांनी नारायण राणे, प्रसाद लाड यांना टोला लगावला. शिवसेना आणि भाजप राजकीयदृष्ट्या वेगळे झाले आहेत. मात्र दोन्ही पक्षांमधला हिंदुत्वाचा धागा कायम आहे. मात्र भाजपमधले बाटगे वातावरण खराब करण्याचं काम करत आहेत. त्यांच्याकडून बेताल वक्तव्यं सुरू आहेत. अशी विधानं देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार यांच्यासारखी भाजपची जुनीजाणती मंडळी कधीही करणार नाहीत, अशा शब्दांत राऊतांनी भाजपच्या मोजक्या नेत्यांचा समाचार घेतला.