ठाणे: ठाणे शहरातील नितीन कंपनी आणि ठाणे महापालिका मुख्यालयासमोर सकाळीच ठाणेकरांचे लक्ष्य वेधणारे काही बॅनर झळकत होते. या लावलेल्या बॅनरवरून थेट शिंदे गटाला टार्गेट करण्याचा प्रयत्न त्यांच्या विरोधकांकडून केला गेला. भूखंडाचे श्रीखंड ठाणेकरांना वाटणार का?, खाऊन खाऊन 50 खोके माजलेत बोके माजलेत बोके असे मजकूर असलेले बोलके बॅनर महापालिका प्रशासनाने तातडीने हटवले. मात्र ही केलेली बॅनरबाजी शिंदे गटाला चांगलीच जिव्हारी लागली आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी थेट बॅनर लावणाऱ्यांची नावे माहिती असल्याचा दावा केला. मात्र त्यांनी नावे जाहीर केलेली नाही. तसेच बॅनर लावणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचे स्पष्ट करत, हिम्मत असती तर बॅनरवर नावे लिहिली असती असे म्हटले आहे.
मंगळवारी सकाळीच कामानिमित्त बाहेर पडलेले ठाणेकरांचे लक्ष काही बॅनर्सने आपल्याकडे वेधून घेतले. ठाण्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नितीन कंपनी आणि शिंदे गटाच्या कब्जात असलेल्या ठाणे महानगरपालिकेसमोरच हे बॅनर लागल्याने ठाणेकरांना आश्चर्याचा धक्का बसला. ” भूखंडाचे श्रीखंड ठाणेकरांना वाटणार का?” आणि ” खाऊन खाऊन ५० खोके माजलेत बोके माजलेत बोके ” असं मजकूर छापलेले हे बॅनर्स झळकल्याने ते बॅनर्स शिंदे विरोधी गटाने लावले असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातच अशा प्रकारचे बॅनर लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तर लावण्यात आलेल्या सर्व बॅनर वरती महापालिकेचे अधिकारी महेश आहेर यांच्या उपस्थितीत कारवाई करत ते बॅनर तातडीने हटविण्यात आले.
याचदरम्यान शिंदे गटाचे प्रवक्ते म्हस्के यांनी, रात्रीच्या अंधारामध्ये हे बॅनर्स लावलेले आहेत. त्यांच्यात जर हिम्मत असतील तर त्याखाली स्वतःची नाव लिहिली असती. असे म्हटले. तसेच गेले अडीच वर्ष महाराष्ट्रात सत्ता असताना, त्या महाराष्ट्राला लुटून खाऊन हे बोके मारलेले आहेत आणि त्यांचे ताट हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते खेचून बाहेर टाकले आहे. त्याच्यामुळे त्यांचा तीळ पापड झालेला आहे. असा आरोप करताना, रागात आणि द्वेषातून अशा पद्धतीच्या कृत्या करतात. परंतु म्हस्के यांनी हे डरपोकपणाचे लक्षण आहे असे म्हटले आहे. पुढे बोलताना जर हिम्मत असतील तर खाली तुमचं नाव त्याच्यावर त्या ठिकाणी लिहायला पाहिजे होते असे म्हणून आम्ही पोलिसांकडे तसेच महानगरपालिका सुद्धा तक्रार करणार आहे आणि ज्यांनी बॅनर्स लावले त्यांच्यावरती कारवाई होणार आहे. म्हटले आहे. दरम्यान हे बॅनर्स लावण्यामागे कोण आहे. हे आम्हाला माहीत आहे. याच्या मागे जे लोक आहेत. भूखंडाच्या प्रकरणांमध्ये कोण आत गेले होते या सगळ्या गोष्टी आणि हा इतिहास ठाणेकर विसरलेले नाही असेही ते म्हणाले.