टाटा एअरबससह आतापर्यंत चार मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेले आहेत. आता नागपूरच्या मिहानमध्ये होणारा सॅफ्रन कंपनीचा प्रकल्पही हैदराबादला गेल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, राज्यात मोठा प्रकल्प येईल असा लॉलीपॉप दाखवला जातोय, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
सुप्रिया सुळेंनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी सुळे म्हणाल्या की, मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात जे सुरू आहे ते दुर्दैवी आहे. तूतू-मैंमैं करण्यापेक्षा राज्यात जास्तीत जास्त प्रकल्प कसे येतील याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवायला हवी, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
पुढच्या वेळी यापेक्षाही मोठा प्रकल्प राज्यात येईल असा लॉलीपॉप दाखवला जातोय. मी तर म्हणते सगळेच प्रकल्प राज्यात यायला हवेत. विद्यमान सरकारमधील मंत्री महाविकास आघाडी सरकारमध्येही होते. तेव्हा ते झोपलेले होते का?, असा सवाल देखील सुळेंनी उपस्थित केला.
राज्यात ईडी सरकार सत्तेत आल्यानंतर अनेक प्रकल्प बाहेर जात आहेत. या सरकारला सत्तेत येऊन तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. तरीही राज्यातील प्रकल्प बाहेर जात असल्याचे खापर महाविकास आघाडी सरकारवर फोडलं जात आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.