जगभरात पसरलेल्या ‘करोना’ व्हायरसला रोखण्यासाठी देशभरातील विविध रूग्णालये आणि संस्थांनी पुढाकार घेतला असून आता मुंबई मेट्रो प्रशासनाने खबरदारीचे पाउल उचलले आहे. राऊंड ट्रीपनंतर सर्व मेट्रो ट्रेन स्वच्छ केल्या जाणार आहेत. याशिवाय मेट्रो स्थानकांवरही स्वच्छता केली जाणार आहे. जगभरातील तीन हजारांहून अधिक बळी घेणाऱ्या करोना व्हायरसने भारतातही शिरकाव केला आहे. भारतातही तीसहून अधिक जणांना करोना व्हायरसची लागण झाली आहे.
मेट्रोच्या कर्मचाऱ्यांसाठी ‘हायजिन अॅट द बेस्ट’ ही मोहीम हाती घेतली आहे. मोहिमेनुसार, कुणीही घाबरून जाऊ नये. चिंता करण्याचे कारण नाही. तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे मेट्रो ट्रेनची स्वच्छता केली जाणार आहे. त्याअंतर्गत प्रत्येक राऊंड ट्रीपनंतर सर्व गाड्या स्वच्छता केल्या जातील. तसेच रात्री सर्व ट्रेनची स्वच्छता केली जाणार आहे. याचबरोबर मेट्रो रेल्वे स्थानकेही स्वच्छ केली जाणार आहेत. दररोज रात्री स्थानकांवर स्वच्छता केली जाईल. तिकीट खिडक्या, लिफ्ट आणि एस्केलेटर आणि रेलिंगचीही साफसफाई करण्यात येणार आहे. रेल्वे स्थानकांतील स्वच्छतागृहे दररोज स्वच्छ केली जातातच, पण आता स्वच्छतागृहांमध्ये साफसफाई करण्यासाठी मशीन ठेवण्यात आल्या आहेत.
करोनाला रोखण्यासाठी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारसह देशातील सर्व राज्ये, आरोग्य केंद्रे, सामाजिक संघटना, विविध संस्था वेगवेगळ्या उपाययोजना आणि खबरदारी घेत आहेत. त्यामुळे मेट्रोसारख्या सार्वजनिक ठिकाणी मेट्रो प्रशासनाने खबरदारी म्हणून विविध उपाययोजना केल्या आहेत.