5 वर्षांपूर्वी प्रयोगशाळेत सुविधा नव्हत्या. त्यानंतर प्रयोगशाळा अद्ययावत झाल्याने पाण्याबरोबर इतरही अन्न नमुन्यांची तपासणी सोपी झाली आहे. आम्ही फक्त नमुन्यांचे अहवाल देतो. कारवाईचे अधिकार आम्हाला नसल्याने आम्ही कारवाई करत नाही. प्रयोगशाळेतील कर्मचार्यांना अत्याधुनिक प्रशिक्षण देण्यात आले आहे.
– संतोष जठार, अन्न विश्लेषक, पालिका प्रयोगशाळा.
पाणी नमुने तपासण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून सुरू करण्यात आलेल्या प्रयोगशाळेमध्ये स्वत:च्या कामाऐवजी पोलीस तपास चाचण्यांबरोबरच रेल्वेच्या खाद्यपदार्थांचे नमुने तपासण्याचा भार पडला आहे. यामुळे पालिकेचे काम अर्धवट अवस्थेत राहू लागले आहे. पालिकेच्या प्रयोगशाळेत अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे तपासणीसाठी आलेल्या नमुण्याबाबत योग्य आणि अचूक अहवाल मिळतो. त्यामुळे इतर शासकीय यंत्रणांकडूनही तपासणीसाठी विविध नमुने पाठवले जातात. पालिकेच्या प्रयोगशाळेची विश्वासार्हता वाढू लागल्याने त्याचा फटका पालिकेला बसत आहे. तपासासाठी येणार्या पोलिसांकडील प्रकरणांना प्राधान्य द्यावे लागते. त्यांना अधिक महत्व द्यावे लागते.
महानगरपालिकेकडून नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. काही ठिकाणी पाणी दूषित येते त्यामुळे आजार पसरत असतात.अशा ठिकाणच्या पाण्याचे नमुने तपासणी करण्याचे काम पालिकेच्या प्रयोगशाळेकडून केले जायचे. पाच वर्षांपूर्वी या प्रयोगशाळेची अवस्था बिकट होती. पाण्याचे नमुने घेतल्यावर त्याचा अहवाल 72 तासांनी यायचा. मात्र त्यानंतर या प्रयोगशाळेत आमूलाग्र बदल करण्यात आले. पाणी तपासणीसाठी एमएफटी टेक्निक वापरण्यात येऊ लागली. त्यामुळे 24 तासात अहवाल मिळणे सोपे झाले. संशोधन करणार्या नव्या मशिनरीमुळे पाण्याबरोबर इतर नमुन्यांचीही तपासणी करणे सोपे झाले, असे या प्रयोगशाळेचे विश्लेषक संतोष जठार यांनी सांगितले.
मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये आणि बालवाड्यांमध्ये दिल्या जाणार्या खिचडीचे महिन्याला सुमारे 500 ते 600 नमुने येतात. पालिका शाळांमधून आणि इतर ठिकाणांहून अन्न विषबाधांच्या तक्रारीही येतात. त्याची तपासणी या प्रयोगशाळेत केली जाते. 14 दिवसात अहवाल सादर केला जातो. महापालिकेच्या प्रयोगशाळेतील अहवाल न्यायालयात सादर केल्यावर हा अहवाल ग्राह्य धरला जातो. त्यामुळे प्रयोगशाळेकडे आता इतरही यंत्रणांकडून तपासणीसाठी मोठ्या संख्येने नमुने पाठवले जात असल्याचे जठार म्हणाले.
पोलिसांकडून अन्न भेसळ, सिगारेट, गुटखा, सुगंधी सुपारी याचे वर्षाला सुमारे 500 नमुने तपासणीसाठी येतात. रेल्वेकडून पाण्याचे एक हजार नमुने तर कस्टम विभागाकडूनही सिगारेटचे मोठ्या संख्येने नमुने येतात. पश्चिम आणि मध्य रेल्वे तसेच कोकण रेल्वेकडून लांब पल्ल्याच्या प्रवासात दिल्या जाणार्या अन्नाचे नमुने योग्य आहेत किंवा नाही. या अन्नात पोषक मूल्ये बरोबर आहेत की नाही, हे तपासणीसाठी प्रयोगशाळेत येतात. या अहवालानंतर यंत्रणांकडून संबंधितांवर कारवाई केली जाते
‘
नमुने तपासणीची आकडेवारी
पालिका शाळा – 500 – 600
पोलीस – 500 रेल्वे – 1000