पोलादपूर- महाबळेश्वर महामार्गावर भीषण अपघात झाला. मिनी बस ८०० फूट खोल दरीमध्ये कोसळली. हा अपघात नेमका कसा झाला काय झाले असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. या अपघातामध्ये ३२ जणांचा मृत्यू झाला. तर २ जण सुदैवाने वाचले. या अपघातामध्ये सुखरुप वाचलेल्या प्रकाश सावंत देसाई यांनी हा अपघात नेमका कसा झाला हे सांगितले. महाबळेश्वरकडे बस जात असताना आंबेनळी घाटाजवळ मातीच्या ढिगाऱ्यावर बसचे चाक सरकून ते फिरले आणि बस थेट दरीत कोसळली.
अवघ्या तासाच पिकनिकचा आनंद ओसरला
दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी दोन दिवस सुट्टी असल्याने महाबळेश्वरला पिकनिकला जात होते. पिकनीकला जाण्यासाठी त्यांनी मिनीबस केली होती. या बसमधून ३४ जण प्रवास करत होते. सकाळी ९ वाजता एक ग्रुप फोटो काढून हे सर्व जण महाबळेश्वरच्या दिशेने निघाले. पण पोलादपूर- महाबळेश्वर रस्त्यावरील आंबेनळी घाटात १० च्या दरम्यान त्यांची बस दरीत कोसळली. पिकनिकला जाण्याचा त्यांचा आनंद काही वेळातच ओसरला. पिकनिकला जाताना काढलेल्या या ग्रुपफोटोमध्ये दिसणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर काळाने घाला घातला.
आणखी एक जण वाचला
या बसमधून प्रवास करत असताना प्रकाश सावंत-देसाई हे ड्रायव्हरच्या बाजूला बसले होते. बस दरीत कोसळताना त्यांनी बसबाहेर उडी मारली त्यामुळे ते वाचले. ही बस तीन टप्प्यामध्ये दरीत गेली. त्यामुळे बसमध्ये असणारे इतर जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत होती. अपघातामध्ये ३४ जणांपैकी ३३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत होती. पण आता बचावकार्या दरम्यान आणखी एक जण जिवंत असल्याचे समोर आले आहे. गंभीर जखमी झालेल्या या कर्मचाऱ्याला पोलादपूरच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हालवण्यात आले आहे.