घरमहाराष्ट्रअपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कालबद्ध नियोजन

अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कालबद्ध नियोजन

Subscribe

जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिला शब्द, नाशिकमधील बैठकीत विविध प्रकल्पांचा आढावा

नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील जलसंपदा विभागाच्या अंतर्गत येणार्‍या उत्तर महाराष्ट्र प्रदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ व लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी पुर्वेकडे गोदावरी खोर्‍यात वळविण्याच्या कामासंबंधातील मुलभूत बाबींची चर्चा करण्याच्या हेतुने आज जलसंपदा विभागाच्या प्रकल्पांचा आढावा घेतला असून उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्याला पाणी मिळण्यासाठी मोठ्या प्रकल्पांचे शाश्वत, परिणामकारक नियोजन करण्यात यावे. तसेच जिल्ह्यातील छोट्या प्रकल्पांना गती देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रमाची आखणी करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिल्या आहेत.

आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जलसंपदा विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, हिरामण खोसकर, नितीन पवार, सरोज आहेर, डॉ. राहुल आहेर उपस्थित होते. यावेळी बोलतांना जयंत पाटील म्हणाले, अपूर्ण प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी अर्थिक तरतूद करण्याबरोबरच शिल्लक कामांसाठी सामित्व मंजूर करणे तसेच नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातील वगळण बंधार्‍यांच्या व लिफ्टच्या कामात शासनाने विशेष लक्ष केंद्रीत केले असून तातडीने ही कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. गोदावरी खोर्‍यातील प्रकल्पांचे पाणी नाशिक, नगरसह जायकवाडीपर्यंत मुबलक तसेच सातत्यपूर्ण प्रवाहात राहण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. जिथे शक्य आहे तिथे पाणी वळवण्यासाठीच्या शक्यता तपासून त्याप्रमाणे आखणी करण्यात येईल. तसेच लहान व पटकन पूर्ण होणारे प्रकल्प तात्काळ पूर्णत्वासाठी नेले जातील त्यासाठी निधीची तरतूदही केली जाईल असे ते म्हणाले. मोठ्या प्रकल्पांसाठी प्रसंगी कर्जही काढण्याचे नियोजन केले जाईल असे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

यावेळी जलसंपदा विभागाचे सचिव एन.व्ही. शिंदे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, अधिक्षक अभियंता अलका अहिरराव, अधिक्षक अभियंता अरुण नाईक, (अहमदनगर) अधीक्षक अभियंता आमले, (धुळे) ऊर्ध्व गोदावरी कार्यकारी अभियंता राहुल पाटील, कार्यकारी अभियंता सागर शिंदे, नांदूरमध्यमेश्वर कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंपी आदी उपस्थित होते.

गुजरातला एक थेंबही देणार नाही ः भुजबळ 

महाराष्ट्राच्या जमीनीवर पडणारे पाणी महाराष्ट्राला मिळाले पाहिजे त्याचा हक्क आम्ही सोडणार नाही अथवा लिहून देणार नाही. राज्याच्या हक्काचं पाणी राज्यातच रहायला हवे. आमदारांनी सुचवलेल्या छोट्या प्रकल्पांची कामेही तात्काळ पूर्णत्वास नेण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखावा व अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -