पंडित जवाहरलाल नेहरू यांचे एक भाषण आपल्याला फार आवडते, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. एका कार्यक्रमात त्यांनी नेहरूंचे भाषण आपल्याला फार आवडायचे, असे सांगितले. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. ‘नेहरू म्हणत, भारत हा देश नाही तर लोकसंख्या आहे. या देशाचा प्रत्येक नागरिक हा देशासाठी समस्या आहे’. नेहरूंचे हे भाषण आपल्याला फार आवडते असे सांगून गडकरी म्हणाले की, यामुळे मी देशासाठी समस्या बनून राहणार नाही. सहिष्णुता ही भारताची सर्वात मोठी देणगी असून आपल्या व्यवस्थेचा मोठा भाग आहे.
काय म्हणाले गडकरी
नेहरू म्हणाले होते की, आपल्याला एखाद्या समस्येवर तोडगा काढता येत नसेल तर आपण समस्येचा भागही बनता कामा नये. निवडणूक जिंकणे चांगले आहे. पण निवडणूक जिंकून लोकांच्या जीवनात बदल घडवता येत नसेल तर सत्तेत येण्याजाण्याने काहीच फरक पडत नाही, असेही गडकरी म्हणाले. हा देश कोणत्याही पक्षाचा नाहू तर १३० कोटी लोकांचा आहे.गडकरी यांनी नेहरूंचे कार्यक्रमात जाहीर कौतुक केल्याने भाजपची पंचाईत झाली आहे. भाजपने अद्याप गडकरी यांच्या वक्तव्यावर जाहीर प्रतिक्रिया दिलेली नाही. तर काँग्रेसचे कपिल सिब्बल यांनी गडकरींच्या विधानाचे स्वागत केले आहे.