तब्बल ९ महिन्यानंतर नायर रुग्णालयातील एमआरआय मशीन पुन्हा सुरू करण्यात आले आहे. नायर रुग्णालयातील एमआरआयमध्ये अडकून ३२ वर्षीय राजेश मारु यांना आपला जीव गमवावा लागला होता. तेव्हापासून रुग्णालयातील एमआरआय विभाग बंद होता. ही मशीन दुरुस्त करण्यासाठी पालिका आणि रुग्णालय प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात आले होते. जवळपास ९४ लाख रुपये खर्च करुन ही मशीन दुरुस्त करण्यात आली आहे.
मशीन किमान नऊ वर्षे चांगली काम करु शकते – अधिकारी
रुग्णालय प्रशासनापुढे मशीन दुरुस्ती किंवा मशीनमध्ये अपग्रेडेशन आणि नवीन मशीन घ्यावी असे प्रस्ताव होते. मशीन दुरुस्त करण्यासाठी किमान खर्च ९४ लाख आणि नवीन मशीन घेण्यासाठी ३ करोड रुपये एवढा खर्च येणार आहे, असा प्रस्ताव महानगरपालिकेने पालिका आयुक्तांना पाठवला होता. अपघातानंतर, फिलिप्स कंपनीच्या तंत्रज्ञांनी मशीनचे निरीक्षण केले होते. रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी असा दावा केला की, ही मशीन किमान नऊ वर्षे चांगली काम करु शकते. अपघाताआधीपासून नऊ वर्ष ही मशीन सामान्यपणे कार्यरत होती. पण, दुरुस्तीनंतर ही मशीन आणखी काही वर्षांपर्यंत टिकू शकते.
प्रायोगिक तत्त्वावर १० ते १२ रुग्णांवर चाचणी केली जाणार
याविषयी नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल म्हणाले, ” प्रायोगिक तत्त्वावर साधारणपणे १० ते १२ रुग्णांवर ही चाचणी केली जाणार आहे. पण, आता आम्ही समाधानी आहोत की मशीन पूर्वीप्रमाणे सुरू झाली आहे. आधी एमआरआय स्कॅनसाठी २० हून अधिक रुग्ण घेतले जायचे. पण दुर्घटनेनंतर, ही मशीन बंद झाली. डॉ. भारमल पुढे म्हणाले की, ” दुरुस्तीचा अंदाजित खर्च ८० लाख रुपये होता. कंपनी तंत्रज्ञांनीच हा अंतिम अंदाज सादर केला होता, ज्याला आम्ही पालिकेकडे पाठवले होते. पालिकेला अनेक पर्याय देखील सुचवण्यात आले होते जसे की, जुन्या मशीनची दुरुस्ती आणि सुधारणा केली जाऊ शकते किंवा नवीन मशीन खरेदी करता येऊ शकते. पण, आता ही मशीन दुरुस्त झाली आहे. त्याचा आम्हाला आनंद होतो आहे. “