कोळी बांधवांच्या घरांना, मासे सुकवण्याच्या जागा संरक्षित करण्यास विरोध करणाऱ्या काँग्रेसला कोळीवाड्यातून हद्दपार करा, असे आवाहन मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी केले आहे. महायुतीचे उत्तर मुंबईचे उमेदवार खासदार गोपाळ शेट्टी यांच्या प्रचारासाठीची मढ येथे शुक्रवारी दि. १२ रोजी संध्याकाळी कोळी बांधवांची जाहीर सभा झाली. त्यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.
कोळी बांधवांसाठी केले कामे
दरम्यान, सभेमध्ये मुंबईतील कोळीवाड्यांचा पुनर्विकास करता यावा आणि मुळ मुंबईकर असणाऱ्या कोळी बांधवाना आपल्या हक्काचे घर मिळावे म्हणून आम्ही गेली अनेक वर्षे संघर्ष केला आहे. भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर कोळीवाडयांसाठी वेगळा डिसीआर तयार करण्याचा निर्णय झाला. तसेच कोळीवाडयांचे सिमांकन करण्यात आले तसेच आताची असलेली बांधकामे संरक्षित करण्यात आली. तसेच अनेक कोळीवाडे हे सीआरझेड २ मध्ये येत होते त्यासाठी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने सीआरझेडची नियमावली शिथिल केली. त्यामुळे कोळीवाडयांच्या पुनर्विकासाचे मार्ग खुले झाले.
काहि निर्णयाला काँग्रेसचा विरोध
काँग्रेसने गेली साठ वर्षे त्यांचे सरकार असताना त्यांनी काही केले नाही. मात्र, महायुतीचे सरकार राज्यात आणि केंद्रात आल्यानंतर कोळी बांधवाना घरे मिळावीत, कोळीवाड्यांचे सिमांकन व्हावे, मासे सूकविण्याच्या जागा कोळी बांधवांसाठी संरक्षित व्हावे या दृष्टीने काम करण्यास सुरूवात केली. काही निर्णय झाले त्यावेळी मात्र काँग्रेसने विरोध करण्याची भूमिका घेतल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.