मतांसाठी रोज रस्त्यावर सरकारच्या विरोधात गळे काढणा-या काँग्रेसला मौलाना आझाद यांच्या जयंतीचा विसर पडला. आज कुठलाही कार्यक्रम आयेाजित करण्यात आल्याचे दिसून आले नाही अशी टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी आज येथे केली आहे. मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळातर्फे आज सह्याद्री अतिथीगृहावर भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमा दरम्यान आशिष शेलार यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासह मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्यासह भाजपनेते उपस्थित होते.
२० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर
या कार्यक्रमामध्ये अल्पसंख्यांक समाजाच्या २० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे मंजूरी पत्र मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आले. तर ज्या विद्यार्थ्यांनी कर्ज घेऊन आपले शिक्षण पुर्ण केले आणि आता चांगल्या नोकरीत आहेत अशा ६ विद्यार्थ्यांनी कर्जाचे पैसे महामंडळाला परत केले. या विद्यार्थ्यांचा तसेच ५ महिला ज्यांनी आपल्या उद्योगासाठी कर्ज घेतले आणि ते परत केले अशा अल्पसंख्याक समाजातील ५ महिलांचा सत्कार मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.
काँग्रेस परिवारवादी पक्ष
दरम्यान, आमदार आशिष शेलार यांनी कॉंग्रेसचा खरपूस समाचार घेतला. काँग्रेसचे अध्यक्ष असलेल्या मौलाना आझाद यांच्या जंयतीचा विसर या पक्षाला पडला आहे. आज शहरात कुठे जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आल्याचे दिसून आले नाही. सरकारच्या विरोधात मतांसाठी रोज रस्त्यावर उतरून नाटक करणारे कॉंग्रेसचे नेते मौलाना आझाद यांना मात्र विसरले. भारतरत्न पुरस्कार देतानाही काँग्रेसने कसा दुजाभाव केला. ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला ते सर्वच महनीय व्यक्तीच आहेत त्याबाबत आमच्या मनात आदर आहे. पण कॉंग्रेस हा परिवारवादी पक्ष असल्याची टीका शेलार यांनी केली आहे.
मतांसाठी अल्पसंख्याक समाजाची फसवणुक
काँग्रेसने पहिल्यांदा १९७१ ला पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी यांना भारतरत्न सन्मान देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर सन १९९१ ला माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात आला. तर कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि देशाचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना आझाद यांना मात्र १९९२ ला मरणोत्तर हा पुरस्कार देण्यात आला अशी टीकाही आशिष शेलार यांनी केली. अल्पसंख्याक समाजाची केवळ मतांसाठी कॉंग्रेसने फसवणूक केली अशी टीकाही त्यांनी केली.