घरमुंबईएटीकेटी, फेरपरीक्षेतील विद्यार्थ्यांना कागदपत्रांची पडताळणी बंधनकारक

एटीकेटी, फेरपरीक्षेतील विद्यार्थ्यांना कागदपत्रांची पडताळणी बंधनकारक

Subscribe

अर्ज भरण्यातील समस्येमुळे शिक्षण विभागाचा निर्णय

दहावीच्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेले व एटीकेटी लागलेल्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश प्रक्रियेमध्ये अर्ज भरण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. यासंदर्भातील तक्रारींची दखल घेत विद्यार्थ्यांना अर्ज भरल्यानंतर मार्गदर्शन केंद्रावर जाऊन कागदपत्रांची पडताळणी करणे शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून बंधनकारक करण्यात आले आहे. जेणेकरून अर्जातील त्रुटी दूर होऊन त्यांच्या प्रवेशाचा मार्ग सुकर होईल, अशी माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून देण्यात आली.

राज्य मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. फेरपरीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ‘प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर प्रवेशप्रक्रिया सुरू केली. त्यानुसार फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेले व एटीकेटी लागलेल्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली. परंतु या विद्यार्थ्यांकडे परीक्षेचे दोन निकाल असल्याने त्यांना अर्जात गुण भरणे, जातप्रमाणपत्राची माहिती भरणे, तसेच फेब्रुवारीत झालेल्या परीक्षेच्या निकालापूर्वी या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. त्यावेळी त्यांनी त्यावेळचा आसनक्रमांक अर्जात नोंदवला होता. परंतु फेरपरीक्षेवेळी त्यांना दुसरा आसन क्रमांक देण्यात आल्याने त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. यासंदर्भात विद्यार्थ्यांकडून प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यापासून अनेक तक्रारी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे येत होत्या. तक्रारदार विद्यार्थ्यांचे कार्यालयातून निरसन करण्यात आले तरी अन्य विद्यार्थ्यांकडून चुकीचा अर्ज भरला जाऊन त्यांना प्रवेश प्रक्रियेतून बाहेर फेकले जाऊ नये यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने या विद्यार्थ्यांना दोन भागात अर्ज भरून झाल्यावर कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी मार्गदर्शन केंद्रावर जाणे बंधनकारक केल्याचे शिक्षण उपसंचालक कार्यालयातील अधिकार्‍याकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

फेरपरीक्षेतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ‘प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य’ या तत्वावर प्रवेशप्रक्रिया सुरू केली असली तरी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर या परिसरात दोन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे नावनोंदणीला विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद मिळाला. परंतु शुक्रवारी पावसाने विश्रांती घेतल्यावर मात्र मोठ्याप्रमाणात नोंदणी करण्यात आली, तसेच शनिवारी यात आणखी वाढ होईल असा विश्वास अधिकार्‍यांनी व्यक्त केला. दरम्यान मुंबई विभागातील कॉलेज सुरू झाले असून, गणपतीच्या सुट्ट्यानंतर पहिली सेमिस्टर होण्याची शक्यता असल्याने उशीराने दाखल होणार्‍या विद्यार्थ्यांचे अतिरिक्त तास घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करावा असे निर्देशही शिक्षण विभागाने कॉलेजांना दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -