राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये, का कळत नाही; पण पण मला रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालाची आठवण येते, असे ट्विट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रविवारी केल्यानंतर आता भाजपकडून देखील संजय राऊत यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. यावरून आता भाजप आमदार आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सत्तेची मस्ती आल्यानेच राऊतांकडून फालतू, निर्लज्ज शब्दांचा वापर होत आहे, असा प्रहार नारायण राणे यांनी केला. तसेच ‘राज्यपाल आणि राजभवन यांचे अनन्यसाधारण महत्व आहे. खासदारकीची शपथ घेतलेल्या संजय राऊतला माहीत नाही काय? सत्तेची मस्ती आल्यानेच त्यांच्याकडून फालतू आणि निर्लज्ज शब्द येत आहेत. सत्ता चंचल असते आज आहे उद्या नाही असे देखील नारायण राणे आपल्या ट्विटमध्ये म्हणालेत.
शेलार म्हणाले डरावडराव करणाऱ्या प्राण्यांची आठवण येते
दरम्यान, भाजप आमदार आशिष शेलार यांनी देखील राऊत यांच्यावर टीका केली आहे. राजभवनाकडे तोंड करुन काल पत्रपंडित काहीतरी बोलले म्हणे…काय होतं ते ? आम्ही अगोदर नाव दिले नाही. यवतमाळच्या पोटनिवडणुकीत विसरलो…हे सांगायचे आहे की, राज्यपालांवर आता दबाव आणायचा आहे? इथे पत्रपंडित बोलायला लागले की, डरावडराव करणाऱ्या प्राण्यांची आठवण होते, समजनेवाले को इशारा काफी असे ट्विट आशिष शेलार यांनी केले आहे. तर दुसऱ्या ट्विटमध्ये राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्यांना लोकशाहीने जे अधिकार दिलेत त्यानुसार ते निर्णय घेतील. दबाव कशाला आणताय? लोकशाहीच्या नावाने गळा काढता ना, मग आता लोकशाहीने वागा. पत्रपंडितांनी अकलेचे तुणतुणं वाजवण्याची काय गरज? राजभवनाच्या नावाने बोंबा मारायला शिमगा आहे का? असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला.
नेमकं काय म्हणाले राऊत
दरम्यान राज्य मंत्रिमंडळाने राज्यपाल नियुक्त जागेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव सुचवले आहे. मात्र राज्यपाल कोश्यारी यांनी अद्याप उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती केलेली नाही. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांचे हे ट्विट म्हणजे राज्यपालांवर हल्ला असल्याचे म्हटले जात आहे. संजय राऊत हे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले होते की, राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये. का कळत नाही; पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवत येत आहे. समझनेवालों को इशारा काफी है!, असे राऊत म्हणाले होते.