कोरोनाचा विषाणू नक्की कुठून आलाय? तो वटवाघुळामुळेच पसरतो कि अजून कोणत्या कारणांमुळे? कोरोनाचा कहर संपल्यानंतर रीतसर कालांतराने या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधली जाणारच आहेत. मात्र, कोरोनासारखेच जगभरात आढळणारे किमान ७० टक्के आजार हे प्राण्यांमुळे होतात, हे तुम्हाला माहिती आहे का? जागरणने जेएनएनच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार इबोला, निपाहस, सार्स, कोरोनासारखे गंभीर आजार हे प्राण्यांमुळेच पसरतात. पण याला खरंतर प्राणी नसून मनुष्यप्राणीच कारणीभूत आहे. निसर्गचक्रामध्ये गरजेपेक्षा जास्त हस्तक्षेप करणाऱ्या मनुष्याने खाद्य आणि अखाद्य असा कोणताही फरक न करता प्राण्यांना मारून सेवन करणं सुरू केलं. त्यामुळे अखाद्य श्रेणीतल्या प्राण्यांच्या मानवी जीवनातल्या प्रवेशामुळेच हे विषाणू वेगाने पसरत असल्याचं दिसून येत आहे.
आपण वन्य प्राण्यांच्या आयुष्यात हस्तक्षेप केला, तर त्याचे परिणाम समस्त मनुष्य जमातीला भोगावे लागतात हे कोरोनाच्या ताज्या उदाहरणामुळे दिसून आलं आहे. कोरोनाच्या अनुषंगाने चीनी खाद्यसंस्कृती आख्ख्या जगाने पाहिली आहे. कमी-अधिक प्रमाणात जगभरात मनुष्यप्राण्याने अशाच प्रकारे आपल्या खाद्य संस्कृतीसाठी किंवा मनोरंजनासाठी वन्यप्राण्यांच्या भागांमध्ये हस्तक्षेप केला. त्यामुळे या सर्व विषाणूंच्या ‘टार्गेट झोन’मध्ये आपण आलो. जर्नल प्रोसिडिंग ऑफ रॉयल सोसायटीमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार माणूस जसजसा वन्य प्राण्यांच्या संपर्कात जास्त येत जाईल, तसतसा त्याला या विषाणूंचा धोका वाढत जाईल.
खरंतर गेल्या अनेक वर्षांपासून माणसाचं निसर्गावर होत असलेलं अतिक्रमण हे दीर्घकाळातल्या परिणामांच्या दृष्टीने घातक ठरत असल्याचं पर्यावरणवादी कंठरवाने सांगत आले आहेत. मात्र, त्यानंतर देखील माणसाचं हे अतिक्रमण सुरूच आहे. त्यामुळे अशा प्रकारे विषाणूंच्या माध्यमातून निसर्ग जणू काही आपली तीच जागा पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे. कोरोनामुळे जगभरात लॉकडाऊन झाल्यानंतर एकूणच हवेची पातळी उंचावली असून कार्बनडाय ऑक्साईडमुळे हवेतल्या ओझोनच्या थराला पडलेलं छिद्र देखील कमी झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे निसर्ग वाचला तरच आपण वाचू शकू, हेच पुन्हा एकदा या कोरोनाच्या निमित्ताने स्पष्ट झालं आहे.