शिवसेनेवर टीका करणाऱ्या किरीट सोमय्या यांना तिकीट न देता थेट मनोज कोटक यांना तिकीट दिल्यामुळे आता शिवसेनेवर टीका करणाऱ्या इतरही भाजपा नेत्यांना धडकी भरली आहे. किरीट सोमय्या यांची तिकीट कापणे हा नक्कीच विचार करायला लावणारे असून, यापुढे पक्षाची भूमिका मांडताना नेमकं कसे बोलावे आणि काय बोलावे याचा दहावेळा विचार करावा लागेल असे एका भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने खासगीत बोलताना सांगितले. तसेच किरीट सोमय्या यांनी जी शिवसेनेवर टीका केली ती त्यांची वैयक्तिक भूमिका नव्हती ते पक्षाची भूमिका मांडत होते असे देखील या वरिष्ठ नेत्यांने खासगीत बोलताना सांगितले. सगळ्यात महत्वाचे म्हणजे किरीट सोमय्या यांचा पत्ता कट झाल्यानंतर आपल्यावरही अशी वेळ कधीही येऊ शकते अशी भीतीच आता भाजपाच्या नेत्यांच्या मनात येऊ शकते.
हेही वाचा – किरीट सोमय्यांचा अखेर पत्ता कट; मनोज कोटक यांना उमेदवारी
आधी नाथा भाऊ आता सोमय्या
विशेष बाब म्हणजे एकंदरीत परिस्थिती पाहता २०१४ च्या विधानसभा निवडणुकीवेळी युती तोडण्यामध्ये महत्वाचा हात असलेले राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्याबाबतही सध्या अशीच परिस्थिती असून, एकनाथ खडसे एवढे ज्येष्ठ नेते असूनही त्यांना सत्ता असूनही दूर रहावेच लागत आहे. त्यामुळे आधी एकनाथ खडसे आणि आता किरीट सोमय्या हे चित्र पाहता यापूढे शिवसेनेवर टीका करताना १० वेळा विचार करावा लागेल असे देखील या नेत्याने माय महानगरला खासगीत बोलताना सांगितले.
सेनेविरोधात बोलताना विचार करावा लागेल
एवढंच नाही तर, शिवसेनेवर टीका करणाऱ्या माधव भंडारी यांची देखील सध्या तीच गत आहे. ऐनवेळी विधान परिषदेचे तिकीट कापून त्यांच्या जागी प्रसाद लाड यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडली होती. शिवसेनेवर सर्वाधिक टीका भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, एकनाथ खडसे, किरीट सोमय्या, राम कदम, माधव भंडारी, विनोद तावडे यांनी केली होती. त्यातील एकनाथ खडसे, राम कदम, विनोद तावडे आणि आता किरीट सोमय्या यांना शिवसेनेवर टीका करणे भोवल्यामुळे यानंतर नंबर आशिष शेलार यांचा का असा सूर आता दबक्या आवाजात येऊ लागला आहे. दरम्यान एकंदरीत सर्व परिस्थिती पाहता आशिष शेलार यांनी आधीच आपली शिवसेने विरोधातली तलवार म्यान केल्याचे पहायला मिळत आहे.
दरम्यान, शिवसेनेचा कोणताही दबाव नव्हता. भाजपाने ग्राउंड रिऍलिटी पाहूनच हा निर्णय घेतला आहे. – विनोद तावडे, शिक्षणमंत्री