उल्हासनगरमध्ये एका हॉटेल व्यावसायिकाकडून खंडणी मागणाऱ्या बोगस पत्रकाराच्या मुसक्या आवळण्यात ठाणे खंडणी विरोधी पथकाला यश आले आहे. या बोगस पत्रकारासह एका सामाजिक संस्थेच्या दोन खजिनदारांनाही पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने आरोपींना १ सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ‘महादान कल्याण’ ही कथित सामाजिक संस्था असून या संस्थेचे सुरज मनवानी याने उल्हासनगरातील हॉटेल व्यावसायिक रवी शेट्टी यांना फोन करून तुमच्या हॉटेल मध्ये गैरप्रकार चालू आहेत. उल्हासनगरात धंदा करायचा असेल तर २५ हजार रुपये द्यावे लागतील नाहीतर पोलिसांत खोटी तक्रार करणार, अशी धमकी दिली. शेट्टी यांनी २३ ऑगस्टला ५ हजार रुपये दिल्यावर मंगळवारी रात्री उर्वरित रक्कम घेण्यासाठी सूरज मनवानी याने त्याची माणसे पाठवली होती. तत्पूर्वीच रवी शेट्टी यांनी ठाणे खंडणी विरोधी पथकाचे कार्यालय गाठून माहिती दिली आहे.
आरोपींची कसून चौकशी सुरु
रवी शेट्टी यांनी २७ ऑगस्टला रात्रीच्या सुमारास खंडणीचे पैसे घेण्यासाठी येणार असल्याचे ठाणे खंडणी विरोधी पथकाला माहिती दिली होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदिप शर्मा, सहाय्यक पोलिस निरीक्षक राजकुमार कोथमीरे, उपनिरीक्षक व्ही.व्ही.कूटे, तसेच अंकुश भोसले, संदिप भांगरे, साबळे, महाले आदिंनी हॉटेल सेंट्रल प्लाझा येथे सापळा रचून पैसे घेण्यासाठी आलेल्या तरुण असरानी, जावेदअली सय्यद, सुरजीत सरकार यांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या तरुण असराणीकडे साप्ताहिक ‘मुंबई आजतक’चे कार्ड असून जावेदअली सय्यद आणि सुरजीत सरकार हे दोघे ‘महादान कल्याण’ या एनजीओ संस्थेचे खजिनदार आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी यापूर्वी आणखीन किती हॉटेल व्यावसायिकांकडून खंडणी उकळली याची कसून चौकशी वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदिप शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक राजकुमार कोथमीरे यांनी दिली आहे.