मुंबईच्या गिरगावमधील सुभाषगल्लीत एका इमारतीचे पुनर्वसनाचे काम चालू आहे. ती इमारत अगोदर तीनमजली होती. आता तीन मजले तोडून त्या ठिकाणी १८ मजली इमारत बांधण्यात येत आहे. या इमारतीचे बांधकाम मागील सहा महिन्यांपासून चालू आहे. इमारतीत पार्किंगच्या व्यवस्थेसाठी जेसीबी मशिनच्या साह्याने तीन माळ्यांइतक्या खोलीचा खड्डा या ठिकाणी खणण्यात आला आहे. परंतु, त्यामुळे मंगळवारच्या मध्यरात्री या इमारतीची नजीकची गल्ली १५ फूट खाली खचली. त्यामुळे मंगळवारी रात्री तेथे राहणाऱ्या नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. त्याचबरोबर त्या इमारतीच्या नजीकच १०० वर्षे जुनी इमारत आहे. त्या इमारतीच्या भिंतीनाही या घटनेमुळे भेगा पडल्या आहेत.
या घटनेविषयी बोलताना तेथील एका प्रत्यक्षदर्क्षी रहिवाशाने सांगितले की, पाच दिवसांअगोदरच या ठिकाणचा थोडासा भाग खचला होता. मात्र, ते निदर्शनास येऊनही तेथील लोकांनी दुर्लक्ष केले. आता मंगळवारी झालेल्या या घटनेत १५ फूट खोल, ६ फूट लांब तर ५ फूट रुंद असा खड्डा पडला आहे. या गल्लीच्या समोरच १०० वर्षांची जुनी इमारत आहे. त्या इमारतीलाही मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत. इमारतीच्या तळमजल्यावर राहणाऱ्या रमेश सिघवन यांच्या घराला जास्त भेगा पडल्या आहेत. त्याचबरोबर आजूबाजूच्या इतर इमारतींनाही भेगा पडल्या आहेत.
पुनर्विकासित होणाऱ्या इमारतीचे मालक आणि विकासक यांनी सांगितले की, त्या ठिकाणी नविन इमारत बनविण्याअगोदर संपूर्ण बाबींचा विचार केला गेला होता. त्याचबरोबर त्यांच्या इंजिनिअरने पास केलेल्या इमारतींचेही सर्वेक्षण केले गेले होते.