देशभरातील जनता पेट्रोल, डिझेलच्या भरमसाठ दरवाढीमुळे त्रस्त झाली आहे. पेट्रोल, डिझेलच्या किंमती आटोक्यात आणाव्यात म्हणून पेट्रोलियम पदार्थ जीएसटी अंतर्गत आणावेत आणि पेट्रोल व डिझेलवर जो मोठ्या प्रमाणात अनावश्यक कर लादलेला आहे, तो कमी करावा, या मागणीकरिता सरकारवर दबाव आणण्यासाठी गुरुवारी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली कलिना हायवे ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला.
जोपर्यंत पेट्रोलियम पदार्थ जीएसटी अंतर्गत सरकार आणत नाही तो पर्यंत रस्त्यावर उतरून सतत आंदोलन करू असा इशारा निरुपम यांनी यावेळी दिला. निरुपम पुढे म्हणाले की, २०१२ मध्ये पेट्रोलचा भाव ७३ रुपये प्रति लिटर होता. त्यावेळी कच्च्या तेलाची किंमत १४८ डॉलर प्रति बॅरल इतकी होती. त्यावेळेस सुप्रसिद्ध सिने अभिनेते अमिताभ बच्चन म्हणाले होते, की पेट्रोलचा दर इतका वाढला आहे. की पेट्रोल विकत घेण्यापेक्षा गाडी जाळून टाकावी असे वाटते.
आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत ७५ डॉलर प्रति बॅरल असताना सुद्धा पेट्रोलची किंमत ८५ रुपये प्रति लिटर आहे. आज २०१८ मध्ये पेट्रोलचा दर इतका वाढलेला असताना अमिताभ बच्चन भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाब विचारणार का? आज अमिताभ बच्चन गप्प का असा प्रश्न निरुपम यांनी उपस्थित केला.